गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो १० प्रकल्पाला गती

* आठ हजार कोटींचा प्रकल्प २०३०पर्यंत होणार पूर्ण
* १५ डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया सुरू

मुंबई: गायमुख ते शिवाजी चौक (मीरा-भाईंदर) या दरम्यानचा मेट्रो लाईन 10 प्रकल्प वेगाने पुढे जात असून 15 डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात बोलावलेल्या बैठकीत श्री.सरनाईक बोलत होते. यावेळी महानगर अतिरिक्त आयुक्त आश्विन कुमार मुदगल, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा व संबंधित अधिकारी उपस्थित होते. पूर्णपणे उंचावरीलबीअसलेल्या 9.718 किमी लांबीच्या या मार्गासाठी अंदाजे आठ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या मार्गावर गायमुख रेती बंदर, चेना गाव, वर्सोवा गाव, काशिमिरा आणि मीरागाव अशी एकूण पाच स्थानके प्रस्तावित आहेत. मार्गिकेचा रंग हिरवा ठेवण्यात आला असून 2031 पर्यंत 4.66 लाख प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मार्गिकेसाठीचा डेपो मोघरपाडा येथे प्रस्तावित आहे. तसेच गायमुख स्टेशनवर लाइन ४ ए आणि मीरागाव येथे मार्गिका ९ शी इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहणार आहे, त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

प्रकल्पासाठी सिस्टरा-डीबी जेव्ही यांची जनरल कन्सल्टंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, प्रकल्पास आवश्यक असलेल्या वनपरवानगी, सीआरझेड मॅंग्रोव्ह, प्राणीजीव संरक्षण विभागाच्या परवानग्या आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जनरल कन्सल्टंटने मेट्रो व 60 मीटर रुंद रस्त्याच्या बांधकामासाठीचे टेंडर दस्तावेज तयार केले असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. मीरा-भाईंदरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मेट्रो मार्गिका 10 प्रकल्प पूर्ण झाल्यास ठाणे व मुंबईकडे होणारी वाहतूक अधिक वेगवान, आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनेल, अशी अपेक्षा मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.