१४ गावातील जिल्हा परिषद शाळा कात टाकणार

मुंबई: नव्याने नवी मुंबई महानगर पालिकेत समाविष्ट केलेल्या १४ गावातील नागरी सुविधा कामांना आता सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात येथील शाळांची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तूर्तास येथील चार जिल्हा परिषद शाळांच्या देखभाल दुरुस्तीच्या निविदा मनपाने काढल्या आहेत. त्यामुळे लवकरच येथील शाळा कात टाकणार आहेत.

कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट केल्यनंतर त्याठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या सुविधा तत्काळ पुरवून त्यात आरोग्य, शिक्षण, पाणी या रस्त्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉ.केलास शिंदे यांना सप्टेंबर महिन्यात दिले होते.

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शाळा ह्या कामांना ताताडीने प्राधान्य द्या. याभागातील दप्तर हस्तांतरणाची कार्यवाही त्वरीत पूर्ण करा, या गावांमध्ये तातडीने मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कार्यवाहीला वेग द्यावा, तात्पुरती आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पोर्ट कैबिनच्या सहाय्याने दवाखाने सुरु करण्यात यावे. असे निर्देश देखील शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका स्थापत्य विभाग कामाला लागले असून पहिल्या टप्प्यात शाळा सुधारण्यावर मनपाने जोर दिला आहे. त्यानुसार येथील दहिसर ठाकूर पाडा, वाकलन, निघू आणि नारिवली गाव या चार जिल्हा परिषद शाळांची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याच्या निविदा नवी मुंबई महानगर पालिका स्थापत्य विभागाने काढल्या आहेत. त्यामुळे लवकरच येथील शाळा कात टाकणार असून नागरी सुविधांची निकड पाहून पुढील काळात त्या कामांना प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती मनपा अभियंत्यांनी दिली.