उलवे कोस्टल रोडमुळे नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी बळकट होणार

६०टक्के काम पूर्ण

नवी मुंबई: आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) यांसह जेएनपीटी, नवी मुंबई सेझ आणि आम्र मार्ग या प्रादेशिक मार्गिकांदरम्यान कनेक्टिव्हिटी बळकट करण्याकरिता सिडकोतर्फे हाती घेण्यात आलेल्या पायाभूत सुविधा उपक्रमांपैकी उलवे किनारी मार्ग प्रकल्प हा सर्वांत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाची ६०टक्के भौतिक प्रगती झाली असून नियोजित वेळेत पूर्ण होण्याच्या दिशेने प्रकल्पाची सातत्याने वाटचाल सुरू आहे.

अंदाजे सात कि.मी. लांबी असणारा सहा पदरी (३+३) उन्नत उलवे किनारी मार्गाचा ५.८० कि.मी. चा टप्पा हा किनारी मार्ग असून ०.९०३ कि.मी. लांबीचा टप्पा हा जागतिक दर्जाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडणारा एअरपोर्ट लिंक रोड आहे. कार्यन्वित झाल्यानंतर हा आधुनिक द्रुतगती महामार्ग नवी मुंबईला जागतिक व्यापार व कनेक्टिव्हिटीचे प्रवेशद्वार बनवण्यामधील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

एमएटीएचएल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आम्र मार्ग यांदरम्यान अखंड व सिग्नलविरहित प्रवास शक्य करण्यासह सध्या अस्तित्वात असलेल्या पाम बीच मार्ग, आम्र मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ३४८ या मार्गांवरील ताण कमी करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईमधील प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार असून प्रवासी, लॉजिस्टिक्स आणि प्रादेशिक व्यापाराकरिताही हे फायदेशीर ठरणार आहे.

रस्त्याच्या मजबुती आणि सुरक्षिततेसाठी प्रकल्पांतर्गत उड्डाण पूल, मोठे पूल, रेल्वे मार्गावरील पूल आणि अन्य महत्त्वाची बांधकामे अंतर्भूत आहेत. प्रीफॅब्रीकेटेड व्हर्टिकल ड्रेन्स (पीव्हीडीज्), दगडी खांब आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प स्थळ येथून प्राप्त करण्यात आलेल्या भराव साहित्याचा वापर, यांचा समावेश असलेल्या ग्राउंड-इम्प्रूव्हमेन्ट तंत्रांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

संपूर्ण मार्गावर उर्जा-कार्यक्षम एलईडी दिवे, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, लेन मार्किंग, ॲन्टी-क्रॅश बॅरिअर आणि स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन पायाभूत सुविधा असणार असून ज्याद्वारे प्रवाशांचा सुरक्षित व सुरळीत प्रवास सुनिश्चित होणार आहे.

“सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासह या प्रदेशाच्या एकंदर आर्थिक विकासाकरिता हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पूर्णत्वास गेल्यानंतर उलवे किनारी मार्ग हा नवी मुंबईतील परिवहन सक्षम करणारा व देशाच्या आर्थिक विकासास गती देणारा ऐतिहासिक पायाभूत सुविधा प्रकल्प ठरणार आहे, असे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.