ठाणे: दिवा परिसरातील सात अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिकेने केलेल्या अलीकडील कारवाईनंतर शेकडो नागरिक अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. आपल्या आयुष्यभराची कमाई लावून घर विकत घेतलेल्या रहिवाशांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर मोठा मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले.
आमचे पुनर्वसन करा, विकासकावर गुन्हा दाखल करा आणि नुकसान भरपाई द्या, अशा घोषणा देत संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले.
बुधवारी पहिल्या टप्प्यात पाडकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. या सात इमारतींमध्ये सुमारे २७५ कुटुंबे वास्तव्यास होती. कारवाईनंतर ही सर्व कुटुंबे बेघर झाली आहेत. अनेकांना तात्पुरते नातेवाईकांकडे किंवा इतर भागात आसरा घ्यावा लागत आहे. “आम्ही जेव्हा घर विकत घेतले, तेव्हा सर्व कागदपत्रे वैध असल्याचा आम्हाला विश्वास होता. आता मात्र आम्ही फसवले गेलो आहोत, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.
आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींनी पालिकेचे अतिक्रमण उपायुक्त उमेश बिरारी यांची भेट घेतली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलन आणखी तीव्र झाले. नागरिकांनी विकासकाविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याची आणि पुनर्वसनाची मागणी केली आहे. आम्ही फसवणुकीचे बळी आहोत. आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा रहिवाशांनी दिला.