ठाणे: पाच दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा ठाण्यात असल्याच्या वृत्ताची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढील रविवारी महा रक्तदान मेळाव्याचे आयोजन केले आहे. पुढील एक वर्ष पुरेल इतका रक्तसाठा गोळा करण्याचे आवाहन मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणेकरांना केले आहे.
‘ठाणेवैभव’ने ठाणे शहरातील रक्तपेढीमध्ये पाच दिवस पुरेल इतकेच रक्त शिल्लक असल्याचे वृत्त आज प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन मनसे नेते श्री. जाधव यांनी ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन केले की पुढील रविवारी रक्त संकलन करण्यासाठी ठाण्यात महा रक्तदान मेळावा आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण झाल्यानंतर या रक्त मेळाव्याचे आयोजन केले जाईल, असे श्री. जाधव यांनी स्पष्ट केले.
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्त साठा जर नसेल तर अनेक रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. रक्तपुरवठा होत नसल्याने अनेकांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अपघातग्रस्त रुग्णांना देखिल रक्ताची गरज असल्याने ठाणेकरांनी राजकारण बाजूला ठेऊन पक्षभेद विसरून सर्वांनी रक्त दान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन श्री.जाधव यांनी इंस्टाग्रामवर केले आहे.