राज्य शासनाच्या निधीतून सुरू केलेली आरोग्य मंदिरे बंदच!

* कोपरीतील तीन कंटेनर विनवापर पडून
* आमदार संजय केळकर यांच्या पाहणीत यंत्रणेचे पितळ उघडे

ठाणे: बंद पडलेल्या आपला दवाखान्यांनंतर ठाणे महापालिकेने ४३ आरोग्य मंदिरे सुरू केल्याची माहिती आयुक्तांनी दिली. मात्र आमदार संजय केळकर यांनी पाहणी केल्यानंतर कोपरीतील तीन आरोग्य मंदिरे उद्घाटनानंतर बंद आणि आजूबाजूला अस्वच्छता असल्याचे उघडकीस आले. ही ठाणेकरांची फसवणूक असून लवकरच जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा श्री.केळकर यांनी दिला.

आपला दवाखाना बंद पडल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी जोरदार टीका करत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यास काळ्या यादीत टाकल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी श्री.केळकर यांना दिली. यावेळी आपला दवाखानाऐवजी ठाणे शहरात ४३ आरोग्य मंदिरे सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. या पार्श्वभूमीवर श्री.केळकर यांनी ठाणे पूर्वेत मीठ बंदर रोड, धोबी घाट आणि बारा बंगला परिसरातील आरोग्य मंदिरांना भेट दिली असता ही मंदिरे बंदच असल्याचे आढळून आले. कंटेनरमध्ये ही आरोग्य मंदिरे असून उद्घाटनाच्या फिती लोंबकळत आहेत. उद्घाटनाचे बॅनरही दिसत आहेत. ही मंदिरे बंद असून आजुबाजूला कचरा आणि चिखल अशी दुरावस्था असल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली.

याबाबत बोलताना श्री.केळकर म्हणाले, चुकीच्या माणसांना काम दिल्याने आपला दवाखाना ही यंत्रणा बंद पडली. आता ठाण्यात गरीब गरजू लोकांसाठी ४३ आरोग्य मंदिरे सुरू करण्यात आल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. यासाठी राज्य शासनाचा निधीही महापालिकेला मिळाला आहे. मात्र प्रत्यक्षात ही आरोग्य मंदिरे बंदच आहेत. लोकप्रतिनिधींना याबाबत खोटी माहिती प्रशासनाने दिली असून ठाणेकरांची ही घोर फसवणूक आहे, त्यांच्या आरोग्याची क्रूर चेष्टा आहे. लवकरच या विरोधात जन आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा श्री.केळकर यांनी दिला. यावेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष महेश कदम, कृष्णा भुजबळ, विशाल कदम, राजेश गाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रसूतीगृहाचा एनआयसीयु बंद

येथील दोन मजली प्रसूती गृहातील दुसऱ्या मजल्यावरील एनआयसीयु विभागात लवकर जन्मलेल्या बालकांसाठी विशेष काळजी घेण्यासाठी २० इन्क्यूबेटर ठेवण्यात आले आहेत, मात्र उद्घाटनानंतर सहा महिने उलटूनही हा विभाग सुरू करण्यात आलेला नाही. पहिल्या मजल्यावरील बालकाला इन्क्यूबेटरची गरज भासल्यास त्याला त्याचा लाभ मिळत नाही, त्याला सिव्हिल रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात पाठवण्याची पाळी येते. सिव्हिलमध्ये हा विभाग नेहमीच फुल्ल असतो तर खासगी रुग्णालयाचा खर्च गरीब कुटुंबांना परवडत नाही. अशावेळी निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगून हा विभाग बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे हास्यास्पद आणि संतापजनक असल्याचे श्री.केळकर म्हणाले.