तातडीने चौकशी करण्याची उबाठा, मनसेकडून मागणी
ठाणे: विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमधील घोळामुळे वोट चोरी झाल्याचा आरोप केला जात असतानाच, ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसरातील मतदार याद्यांमध्ये तब्बल १७,२५८ दुबार नावे आढळल्याचे समोर आले आहे. या संदर्भात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी संयुक्तपणे जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना दिवा शहरात मतदार याद्यांमधील गंभीर अनियमिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील मतदार याद्यांमध्ये तब्बल १७,२५८ दुबार नावे आढळल्याचे समोर आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी दिवा परिसरातील वार्ड क्रमांक २७ आणि २८ मधील मतदार याद्यांची तपासणी केली. या प्राथमिक तपासणीत एकूण १७,२५८ इतकी दुबार नावे आढळली आहेत. यात एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी नोंदवलेले, तसेच काही ठिकाणी वेगवेगळ्या पत्त्यांवर तीच नावे पुन्हा असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असा गंभीर आरोप दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तत्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत, तसेच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्याकडे केली आहे.
दिवा शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या या गंभीर प्रकरणावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही संयुक्त निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुखॲड.रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका योगिता नाईक, मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील, उपशहर प्रमुख मारुती पडळकर, नागेश पवार आदी उपस्थित होते.