ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील सुमारे १४० कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर पगारवाढ आणि बोनसचा निर्णय झाल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे.
आमदार संजय केळकर यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात या कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकली आणि काल झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार संजय केळकर यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी विनोद पवार, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्ता घुगे, कार्याध्यक्ष महेश कदम, सरचिटणीस अजित मोरे, कोषाध्यक्ष सुधाकर शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पाणी पुरवठा विभागात सुमारे १४० कंत्राटी कर्मचारी असून गेली चार वर्षे ते मीटर रिडिंग, पाण्याची देयके वितरित करणे अशी कामे ते करत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना किमान वेतन ३२ हजार रुपये देणे बंधनकारक असताना कंत्राटदार त्यांना अवघे १२ हजार रुपये वेतन देत होते. तर कंत्राटी अभियंत्याला ४० हजार रुपयांऐवजी फक्त १५ ते १७ हजार रुपये वेतन दिले जात होते. कंत्राटदाराकडून होणारी पिळवणूक श्री.केळकर यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली.
या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता या कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार पगारवाढ देण्यात येणार आहे. किमान एक महिन्याच्या वेतनवाढ बोनस देण्यात येईल असे सांगण्यात आले. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात येणार नाही, असे निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष महेश कदम यांनी दिली.