परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संकल्पना साकार
ठाणे: ठाण्यातील ७० जुन्या विहिरींपैकी ३६ विहिरींचे पुनरुज्जीवन पूर्ण झाले असून आज ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर-शास्त्रीनगर भागातील तीन विहिरींचा लोकार्पण सोहळा प्रताप सरनाईक यांच्या हस्ते महापालिकेच्या पाणी खात्याचे अधिकारी अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. त्या निधीतून ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील जुन्या व वापरायोग्य नसलेल्या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी ५० कोटी निधीची तरतूद करण्याची विनंती प्रताप सरनाईक यांनी केली असता ती मान्य केली. त्यानुसार ठाणे महापालिकेने एका सल्लागाराची नियुक्ती करून अहवाल बनविला होता व त्यावर निविदा प्रक्रिया देखील राबविली होती.
विहिरीतील पाणी उपसणे, गाळ काढणे, आडवे बोअर मारून पाण्याचे नैसर्गिक झरे उघडून जास्तीत जास्त पाणी मिळविणे, विहिरींची डागडुजी करणे, आसपासच्या नाल्यांतील पाणी विहिरीत जाऊ नये यासाठी वॉटर प्रुफींग करणे, विहिरींच्या सभोवतालच्या गटार व नाल्यांची दुरूस्ती व डागडूजी करणे जेणेकरून सांडपाणी विहिरीतील पाण्याला प्रदूषित करणार नाही, विहिरींवर लोखंडी ग्रील व जाळी बसविणे, विहिरींच्या तोंडापासून ३ ते ४ मीटरपर्यंत आर.सी.सी. बांधकाम करणे, विहिरीचा सभोवतालचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी विहिरीच्या कठड्याभोवती पेव्हर ब्लॉक बसविणे, इ. कामे केली जातात. त्यानुसार सुमारे ७० विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यापैकी आज पर्यंत ३६ विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण झालेले असून यातील पाणी इतर वापराबरोबरच पिण्यायोग्यही झालेले आहे.
याप्रसंगी माजी नगरसेविका प्राजक्ता खाडे, कांचन चिंदरकर, आशा डोंगरे, संदिप डोंगरे, जयेंद्र दरेकर, रामचंद्र गुरव, संतोष ढमाले, भगवान देवकते, वैभवी दळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.