मुंबई: गणेशोत्सवाच्या आगमनापासूनच पावसानं हजेरी लावली आणि आता गणरायांच्या विसर्जनाच्या सातव्या दिवशी देखील पावसाची रिमझिम सुरूच होती. येत्या दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार विदर्भातील पूर्वेकडे असणारे जिल्हे, चंद्रपूर, गडचिरोली इथं पावसाचा जोर वाढणार असून, या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कोकणात किनारपट्टी भागांसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्येही काळ्या ढगांची दाटी वाढणार असून, या भागाला पावसाचा मारा सोसावा लागणार आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातही पावसाची जोरदार हजेरी असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं या भागांमध्ये हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण आणि गोव्यानजीकच्या घाट क्षेत्रात अतिमुसळधार पावसाचा अंदात असून, मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरींची शक्यता मराठवाड्यासाठी वर्तवण्यात आली आहे, जिथं वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल.