पिनॅकल ऑर्थो रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
ठाणे: अवघ्या सहा महिन्यांच्या बाळावर दर सहा महिन्यांनी शस्त्रक्रिया करत त्याच्या दोन्ही हातांची चिकटलेली बोटे विलग करण्यात पिनॅकल ऑर्थो रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांना यश आले आहे. ‘नॅशनल हॅण्ड सर्जरी डे’निमित्त येथील डॉ.पराग लाड यांनी ‘ठाणेवैभव’ला माहिती दिली.
‘नॅशनल हॅण्ड सर्जरी डे’निमित्त पिनॅकल ऑर्थो रुग्णालयात प्रशिक्षण आणि जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यावेळी बोलताना डॉ.पराग लाड बोलत होते. डॉ. लाड म्हणाले, आमच्या रुग्णालयात रोज हाडांचे १०० रुग्ण येतात. त्यात २० ते २५ रुग्ण हे हातांच्या समस्यांनी त्रस्त असतात. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असते, त्या प्रमाणे हाताच्या दुखण्याला देखील तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असते. देशात फक्त ७०० ते ८०० हॅण्ड सर्जन असल्याचेही डॉ.लाड म्हणाले. मागील आठ वर्षांत पाच हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी यशस्वी शस्त्रक्रिया झालेला आठ वर्षांचा रिशान आणि त्याची आई देखील उपस्थित होती. त्या म्हणाल्या, मला गरोदरपणात बाळाच्या हाताची बोटे एकमेकांना चिकटलेली असल्याचे कळले. त्यानंतर आम्ही बाळाच्या जन्मानंतर या रुग्णालयात डॉक्टरांशी संपर्क साधला. आणि टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करून घेतली. आता रिशान आठ वर्षांचा झाला असून तो त्याच्या हातांनी लेखन, चित्रकला तसेच रोजच्या जीवनाशी निगडित सर्व कामे सहज करतो, असे रिशानची आई म्हणाली.
याबाबत डॉ.लाड म्हणाले, अशा समस्येत मुलांवर दीड वर्षाच्या आतच शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. आम्ही दर सहा महिन्यांनी त्याच्या बोटांवर शस्त्रक्रिया करून ती विलग केली. आता तो सर्वसामान्य मुलांप्रमाणे हातांची आणि बोटांची हालचाल करत असल्याचे डॉ.लाड म्हणाले.
यावेळी हातावर यशस्वी शस्त्रक्रिया झालेले अनेक रुग्ण उपस्थित होते. त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि तज्ज्ञ डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत ज्या ज्या समस्या असतील त्या तातडीने डॉक्टरांना सांगा. या समस्यांसाठीदेखील देखील तज्ज्ञ डॉक्टर असतात. वेळीच उपचार केले तर शस्त्रक्रिया विनासायास आणि यशस्वी होते, असे डॉ. निहारिका म्हणाल्या.