ठाणे : दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्षाबंधनानिमित्त एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ठाणे विभागाच्यावतीने अतिरिक्त बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नियमित गाड्यांसह विशेष मार्गांवर ९१ जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.
यंदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण शुक्रवार, शनिवार असे सुट्ट्यांच्या दिवशी आले आहेत. तसेच, रविवारची सुट्टी देखील आल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सज्ज झाले आहे. मंडळाच्यावतीने शुक्रवार ते रविवार या कालावधीसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात लांब पल्ल्याच्या आणि मध्यम मार्गांवर जादा गाड्यांचे नियोजन ठाणे विभागाने आखले आहे. तसेच, २० हजार नियमित किलो मीटरपेक्षा जादा किलो मीटरचे नियोजन आखल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने दिली.
शुक्रवार ते रविवार या दिवसांमध्ये आगारांमधील एकही वाहन मार्ग बंद राहणार नसल्याची माहितीही विभागाच्यावतीने देण्यात आली. तसेच गर्दी आणि जाडा बसगाड्यांचे नियोजन आगार पातळीवर केले जाणार आहे. त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये आगार कक्षेतील ज्या मार्गांवर प्रवासी संख्या अधिक आहे तेथे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा असणार आहेत. दरम्यान, ८ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या तीन दिवसांसाठी नियोजीत बस व्यतिरिक्त ९१ जादा बसगाडीचे नियोजन एसटी महामंडळाने आखले असून ४५ हजार किलोमीटर जादा वाहतुक करण्याचा निर्णयही या तीन दिवसांच्या कालावधीत घेण्यात आला आहे.
मागील वर्षीचे नियोजन काय होतेमागील वर्षी नियमित पेक्षा ३९ हजार किलोमीटरच्या अनुषंगाने जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे परिवहन मंडळाच्या तिजोरीत १९ लाख ३१ हजारांचे उत्पन्न जमा झाले होते.