प्रकल्पावर नापिकी, बेरोजगारी आणि अनारोग्याचा शिक्का
ठाणे: कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या भिवंडी तालुक्यातील आतकोली येथिल ठाणे महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पाला विरोध करून तो रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत केली.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात श्री.पाटील यांनी आतकोली संघर्ष समितीने या डम्पिंग ग्राउंडला विरोध केल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. ठाणे महापालिका हद्दीतील सुमारे बाराशे टन कचरा दररोज येथे टाकण्यात येणार असून हे डम्पिंग ग्राउंड तयार करताना महापालिकेने तेथील स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पर्यावरण विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. कोणत्याही प्रकारची प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील सुपिक जमिन नापिक होईल, या भागातील तरुणांचे रोजगार बुडतील आणि या परिसरातील विकासाला खीळ बसेल, अशी भीती व्यक्त करुन पंचक्रोशीतील ग्रामस्थ आतकोली संघर्ष समितीच्या माध्यमातून या डम्पिंग ग्राउंडला विरोध करत आहेत. या प्रकल्पामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्यही बिघडण्याची भीती श्री.पाटील यांनी व्यक्त करुन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.
ठाणे महापालिकेचे स्वतःचे डम्पिंग ग्राउंड नाही. दिवा येथिल खाजगी भूखंडवरील डम्पिंग बंद झाल्याने महापालिकेला कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड नव्हते. अखेर राज्य सरकारने पडघा येथिल आतकोली येथिल सुमारे ३८ हेक्टर जमिन ठाणे महापालिकेला दिली असून तेथे कचऱ्यापासून खतlनिर्मिती प्रक्रिया केली जाणार आहे. त्याचे काम देखिल महापालिकेने सुरु केले होते. या भागात कचरा देखिल टाकला जात होता. त्याला या भागातील नागरिकांनी विरोध सुरु केला होता. त्यांच्याशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चर्चा देखिल केली होती, परंतु ग्रामस्थांचा विरोध कायम असून काही जणांनी न्यायालयात याचिका देखिल दाखल केली आहे.