नागपूर समृद्धी महामार्गावर अवघ्या २० दिवसांत खड्डे!

पडघा: समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. शहापूर तालुक्याच्या हद्दीत अवघ्या २० दिवसात आमने ते इगतपुरी तसेच इगतपुरी ते आमने या दोन्ही मार्गिकेवर खड्डे पडले आहेत.

इगतपुरी ते आमने हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा ७६ किमीचा टप्पा आहे. या टप्प्याला ११८२ कोटी रुपये खर्च केल्यानंतर अवघ्या २० दिवसांत पडलेले खड्डे बुजवण्याची नामुष्की रस्ते विकास प्राधिकरणांवर आली आहे. शहापूर तालुक्यात रस्ते भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

या महामार्गावर वाहनांचा वेग प्रतितास ८०, १०० ते १२० दरम्यान असतो, अपघातांना आमंत्रण देणारे खड्डे पडणे, त्यामुळे समृद्धी महामार्गावरील कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.