पावसाचा जोर वाढला, ‘सीना’ धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो

मुंबई: राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे .कमी क्षेत्रावर अधिक पाऊस पडत असल्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे . पेरणीयोग्य पावसामुळे सध्या शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू असून खरिपाच्या पेरण्यांना काही ठिकाणी सुरुवातही झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकणपट्ट्यासह मध्य महाराष्ट्रातील पुणे विभागातही तुफान पावसाने हजेरी लावली. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणारे सीना धरण जूनमध्येच ओवर फ्लो झाले आहे. मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस त्यानंतर थोड्याफार प्रमाणात झालेला वळवाचा पाऊस आणि आता लवकर हजेरी लावलेल्या मान्सूनमुळे राज्यातील धरण साठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. नागपूर, अमरावती, मराठवाडा, नाशिक, पुणे आणि कोकण विभागात लहान मोठ्या धरणांमध्ये सरासरी 30.92% उपयुक्त जलसाठा आहे .

कोणत्या विभागात किती पाणीसाठा?
नागपूर :32.40% (गतवर्षी 36.59% )
अमरावती :39.36% (गतवर्षी 36.83% )
छत्रपती संभाजीनगर :30.78% (गतवर्षी 9.32% )
नाशिक :31.05% (गतवर्षी 22.79% )
पुणे : 27.74% (गेल्या वर्षी 12.99% )
कोकण :36.62% (गतवर्षी 29.26% )

कोल्हापुरात गेल्या चार दिवसांपासून तुफान पावसाने हजेरी लावली आहे. धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस होत असल्याने कोल्हापुरातील राधानगरी धरणात 48.11% पाणीसाठा झाला आहे .दूधगंगा धरणात 16.10% पाणी आहे. सांगलीतील वारणा धरण 25.45 टक्क्यांवर असून साताऱ्यातलं कोयना 16.98 टक्क्यांवर आहे. सोलापुरातील उजनी धरण 44.31 टक्क्यांवर असल्या जलसंपदा विभागाने सांगितले .पुण्यातील भाटघर धरण सध्या 7.61 टक्क्यांवर असून खडकवासला धरणात 46.97% पाणी आहे. पानशेत धरण 13.42 टक्क्यांनी भरले आहे .डिंभे धरणात 12.16% जलसाठा शिल्लक आहे.