ठाण्यात होर्डिंगद्वारे एकत्र येण्याचे आवाहन
ठाणे : राज्यात मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत कोणाकडूनही स्पष्ट विधाने होत नसल्याने सध्यातरी युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान शहर पातळीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन होत असल्याचे दिसत असून प्रत्यक्ष गाठीभेटी आणि होर्डिंगच्या माध्यमातून युतीबाबत सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे दिसत आहे.
डोंबिवलीत पुन्हा एकदा ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याची चर्चा रंगल्याची पाहायला मिळाली. मनसेचे शहर अध्यक्ष राहुल कामत मंगळवारी डोंबिवली पश्चिमेकडील ठाकरे गटाच्या शाखेत गेले होते. त्यांनी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी कामत यांना शुभेच्छा देत पुष्पगुच्छ दिला. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या आधी देखील पलावा पुलाच्या आंदोलनात मनसे आणि ठाकरे गट एकत्र दिसला होता. त्या पाठोपाठ आता मनसेचे शहर अध्यक्ष यांनी ठाकरे गटाच्या शहर शाखेत भेट दिली. यानंतर डोंबिवलीत पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकीकडे मनसेच्या नेत्यांनी डोंबिवलीत पुढाकार घेतला असताना ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने लावलेला भलामोठा बॅनरही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे गटाचे सहप्रवक्ते तुषार रसाळ यांनी हा फलक लावला आहे. या फलकावर, ‘दोन मराठी वाघांनी एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा’, असा मजकूर लिहीला आहे. या फलकावर आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत यांच्या फोटोसह राज ठाकरे, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांचे फोटो एकत्र दिसत आहेत.