पावसामुळे एपीएमसीतील भाज्यांना नाही उठाव

नवी मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबई उपनगरात पावसाने जोर पकडला आहे. याचा बाजार समितीवर देखील परिणाम झाला असून ग्राहकांनी भाजी खरेदी न केल्याने भाज्या तशाच शिल्लक राहिल्या तर आज मंगळवारी देखील जर पावसाचा जोर कायम राहिला तर याच भाज्या खराब होण्याची भीती व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

राज्यात मागील दोन तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र मुंबई उपनगरात रविवार रात्रीपासूनच पाऊस वाढला आहे. एपीएमसी बाजारात रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी सरासरी ६०० गाड्या आवक होत असते. मात्र २६ मे रोजी आवकमध्ये २०टक्के घट होऊन ५०० गाड्या आवक झाली. पाऊस जास्त असल्याने बाजारात ग्राहकांनी पाठ फिरवल्याने भाज्या तशाच पडून राहिल्या.

एपीएमसी बाजारात आवक घटली असली तरी टोमॅटो, शिमला मिरची वगळता इतर भाज्यांचे दर स्थिर होते. आज देखील पावसाचा जोर कायम राहिल्यास भाज्या खराब होण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.