पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुराख्यांना जीवदान

मोहिली येथे कोळी बांधवांचे जीव धोक्यात घालून मदतकार्य

कल्याण : रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे उल्हासनदी दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. यावेळी मोहिली आणि गाळेगाव परिसरातील उल्हासनदी पात्रातील बेटावर सोमवारी अडकून पडलेल्या तीन गुराख्यांची स्थानिक कोळी बांधवांनी जीव धोक्यात घालून सुटका केली.

कल्याण तालुक्यातील मोहिली गावाजवळ उल्हास नदी वाहते. यावेळी पावसामुळे उल्हास नदी पाण्याची पातळी वाढली आणि मोहिली ते गाळेगाव दरम्यान उल्हासनदी पात्रात असलेल्या बेट सदृश्य भागात तीन गुराखी अडकले. उल्हासनदीची पुराच्या पाण्याची वाढती पातळी आणि जीव धोक्यात आल्याने सावल्या वाघे (65), शंकर पाटील (55), देव गायकर (60) सर्व राहणारे मोहीली यांची सुटका करण्यासाठी अ प्रभागक्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, आपत्कालीन यंत्रणा, कर्मचारी वर्ग, अग्निशमन दलाचे जवान, महसूल विभाग कर्मचारी कल्याण तालुका यांनी बचावकार्य सुरू केले.

गाळेगाव येथील स्थानिक कोळीबाधंव गुरूनाथ पवार, रोहन पवार यांनी उल्हास नदी पात्राच्या पुराच्या पाण्यात कौशल्याने होडी चालवत बेटापर्यंत जाऊन तीनही गुराख्यांची सुखरूप सुटका केली आणि सुरक्षितपणे नदीकिनारी आणले. तीन जणांना जीवदान दिल्याने या कोळी बांधवांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

तहसीलदार सचिन शेजाळ यांनी तातडीने गुरूनाथ पवार, रोहन पवार यांच्या धाडसाची दखल घेत कल्याण तहसीलदार कार्यालयात रोख बक्षीस देत सत्कार केला आणि त्यांच्या प्ररेणादायी, धाडसी कामाचे कौतुक केले.