ठाणे-कल्याणात सर्वाधिक घरे
मुंबई: म्हाडा लवकरच चार हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. ही लॉटरी जुलै महिन्यात निघणार आहे. या लॉटरीमध्ये ठाणे आणि कल्याणमधील घरांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, यापैकी एक हजारहून जास्त घरे ही ठाण्यातील चितळसरमध्ये आहेत. म्हाडाच्या या लॉटरीमुळे असंख्य लोकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मुंबई आणि राज्यातील महानगरात सर्वसामान्यांना घर घेता यावे यासाठी म्हाडाकडून दरवर्षी लॉटरी काढली जाते. या लॉटरीमुळे लोकांना स्वस्त दरात घरे मिळतात. 2024 मध्ये म्हाडाने मुंबई मंडळासाठी लॉटरी काढली होती. आता कोकण मंडळासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. जुलै महिन्यात कोकण मंडळ कल्याण आणि ठाणे शहरांसाठी लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने गेल्या दीड वर्षात तीन लॉटरी काढल्या. या लॉटरीमुळे सुमारे दहा हजार लोकांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. जुलैमधील निघणाऱ्या लॉटरीमुळे अनेकांची स्वप्नपूर्ती होणार आहे.
कोकण मंडळांच्या या लॉटरीमध्ये असलेली सर्वाधिक घरे ही ठाणे कल्याणमध्ये आहे. ठाण्यातील चितळसर येथील 1173 घरांचा समावेश आहे. कल्याणमध्ये देखील म्हाडाला तब्बल 2500 घरे मिळणार आहेत. तसेच, म्हाडाला हाउसिंग स्टॉक मधून मिळालेल्या घरांचाही समावेश असणार आहे.
2025-26 च्या अर्थसंकल्पात राज्यभरात 19,497 घरे उभारण्याचे उद्दिष्ट म्हाडाने ठेवले आहे. त्यामध्ये मुंबईतील 5,199 घरांचा समावेश आहे. त्यामुळे म्हाडा घरखरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना दिलासा मिळणार आहे. म्हाडाच्या अर्थसंकल्पात कोकण मंडळातंर्गत 9902, पुण्यात 1,836, नागपूरमध्ये 692, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,608, नाशिकमध्ये 91, अमरावतीमध्ये 169 घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याकरिता मुंबईतील घरांसाठी 5749.49 कोटी रुपये, कोकणातील घरांसाठी 1408.85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात केली गेली आहे. पुण्यातील घरांसाठी 585 कोटी रुपये, नागपूरमधील घरांसाठी 1009 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरमधील घरांसाठी 231 कोटी रुपये, नाशिकमधील घरांसाठी 86 कोटी रुपये, अमरावतीमधील घरांसाठी 65.96 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.