ठाण्यातील काही भागात शुक्रवारी पाणी नाही

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील अत्यंत महत्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने कटाई नाका ते ठाणे दरम्यान गुरुवार ८ मे २०२५ रोजी रात्री १२ वाजेपासून ते शुक्रवार ९ मे २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा केला जातो.

या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. या शटडाऊन कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.