दिवाळीपर्यंत मीरा-भाईंदरकरांना २४ तास पाणीपुरवठा होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी राबवण्यात येणारी ‘सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना’ येत्या सहा महिन्यात पूर्ण होत असून, दिवाळीपर्यंत या योजनेतून महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना २४ तास पाणीपुरवठा होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

सूर्या योजनेच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी, सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रासाठी २१८ दशलक्ष लिटर प्रति दिन पाणीपुरवठा करणारी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेली पाच वर्षे रखडली होती. परंतु सातत्याने पाठपुरावा केल्याने या योजनेचे तांत्रिक काम जवळजवळ पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के काम येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले असून मीरा-भाईंदरकरांना शुद्ध, २४ तास पिण्याचे पाणी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. दरम्यान वसई-काशिद-कोपर ते चेने जलकुंभापर्यंत सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम, वसई खाडी छेदून मायक्रो टॅनेलिंगद्वारे जलवाहिनी टाकण्याचे काम, कवडास येथील उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम, चेने वनविभागाच्या हद्दीतील जलवाहिनी, चेने येथील खासगी जागेतील पुलाचे काम, चेने येथील जलकुभांचे काम या सर्व रखडलेल्या कामाचा आढावा घेऊन मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उपरोक्त कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

यापूर्वी वसई-विरार महापालिकेला सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १७० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा सुरळीत सुरू असून पालघर जिल्ह्यातील ४४ गावांना देखील या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. तथापि, गेली काही वर्षे रेंगाळलेल्या या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील लोकांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या बनला आहे. या पाणीपुरवठा योजने बाबत मी लोकप्रतिनिधी असल्यापासून सातत्याने पाठपुरावा करत आलो असून आता राज्याचा मंत्री या नात्याने माझी जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करून मीरा-भाईंदरकरांना २४ तास शुध्द पेयजल पुरवठा करण्याचे अभिवचन पुर्ण करण्याचा आपला मानस आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.