अवकाळी पाऊस आणि वादळवाऱ्याने झोडपले !

शहापूरमध्ये गारपीट, शेतकऱ्यांचे नुकसान, ठाणे-कल्याणकरांची त्रेधा

ठाणे: हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्याने ठाणेकरांची भंबेरी उडाली. शहापूर, कल्याण तालुक्यातही जोरदार वारा आणि पावसाने झाडे पडली, वाहनांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे आंबा बागायतदार, भाजीपाला उत्पादक आणि वीटभट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आणि व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत.

संध्याकाळी ४.३०च्या दरम्यान जोरदार वारे ठाणे शहरात वाहू लागले होते. आकाशात धूळीचे लोळ दिसत होते. रस्त्यावर पालापाचोळा उडत होता. दिवा भागातील आगासन येथे एका इमारतीवरील पत्रे उडाले होते तर महामार्गवरील झाडे उन्मळून पडल्याने संध्याकाळी वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागला होता. आनंदनगर चेकनाका ते गायमुख दरम्यान वाहतूक कोंडी होती, त्यामुळे संथगतीने वाहने जात होती, त्याचा मनस्ताप ठाणेकरांना झाला.

शहापूर तालुक्यात आंबा बागायत, भाजीपाला व वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान

मागील पाच-सहा दिवसांपासून शहापूर तसेच इतर परिसरात दररोज सायंकाळी पावसाचे वातावरण निर्माण होत होते. शेवटी आज झालेला वादळी वारा व गारपिटीमुळे आंबा बागायतदार, भाजीपाला उत्पादक शेतकरी व वीटभट्टी मालक हवालदिल झाले आहेत. वीटभट्टी व्यावसायिकांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. वाशाळा येथील विलास धानके आणि उमेश धानके यांचे आंबा बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पावसामुळे आंबा बागायतदार, उन्हाळी भाजीपाला लागवड करणारे शेतकरी, वीटभट्टी मालक व बांधकाम व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उघड्यावर झोपड्या उभारून वास्तव्य करणाऱ्या कष्‍टकरी वर्गाचेही हाल झाले. दरम्यान वाशाळा येथील विलास धानके यांचे आंबा बागायतीत ८०० आंब्यांची झाडे असून यामधील ३० आंब्यांची झाडे मोडली असून जवळ-जवळ दोन क्विंटल फळे गळून पडली यामुळे त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.

कल्याणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

शुक्रवारी दुपारी 4 च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. तर वाढत्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. पावसाला सुरवात होताच शहरातील अनेक भागातील बत्ती गुल झाली होती. काही काळ पावसाने हजेरी लावत विश्रांती घेतली.

दुपारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबिवली येथे स्टेशन रोडवर असलेले भले मोठे झाड उन्मळून पडले. झाडालगत उभ्या असलेल्या दुचाकींवर हे झाड कोसळल्याने चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला हटविले असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.