खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत आग्रही मागणी
नवी दिल्ली : महागाई वाढत असताना ईपीएस- ९५ (कर्मचारी निवृत्त योजना ९५) पेन्शनधारक मात्र दरमहा किमान एक हजार रुपये पेन्शनवर जगत आहेत. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहर कालवधीत पेन्शनधारकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत किमान पेन्शन ७,५०० रुपये करावी, अशी आग्रही मागणी केली.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत ईपीएस-९५ पेन्शन योजनेच्या पेन्शनधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे खासदार नरेश म्हस्के यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधले. देशभरात केंद्र आणि राज्य सरकारचे उपक्रम, खासगी संस्था आणि कारखान्यांशी संलग्न असलेले ७८ लाख पेन्शनधारक दरमहा किमान एक हजार रुपये पेन्शनवर जगत आहेत. सध्याच्या परिस्थितीत ही रक्कम अपुरी असून मूलभूत गरजा आणि आरोग्य सेवांपासून ते वंचित आहेत. २०१३ मध्ये कोश्यारी समिती, २०१८ मध्ये कामगार संसदीय समिती आणि ईपीएफओच्या उच्चस्तरीय समितीनेही किमान पेन्शन दरमहा ७,५०० रुपये तर कमाल १०,०५० असावी अशी शिफारस केली होती मात्र त्याची अद्याप ठोस अंमबजावणी झाली नसल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
गेल्या ७-८ वर्षांपासून पेन्शनधारक या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. दुर्दैवाने त्यांचा आवाज आजतागायत ऐकला गेला नाही. ईपीएस-९५ पेन्शन योजनेत त्वरित सुधारणा करावी आणि किमान पेन्शन दरमहा ७,५०० रुपये करावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. तसेच पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सेवा देण्यात याव्यात, ज्यामुळे पेन्शनधारकांचे जीवनमान तर सुधारेल, शिवाय त्यांच्या दशकांच्या योगदानाचाही सन्मान होईल. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य क्रम देऊन त्यांना न्याय देण्याची जबाबदारी या सभागृहाची आणि सरकारची असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील पेन्शनधारकांनी आणि संघटनांनी खासदार खासदार नरेश म्हस्के यांनी नुकतीच भेट घेत पेन्शनधारकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती. खासदार खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत पेन्शनधारकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची ग्वाही दिली होती.