ठाणे: राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे.
औरंगजेब उत्तम प्रशासक होता, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. असे वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्यपालांकडे याबाबत पत्राद्वारे औपचारिक मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आमदार असताना घेतलेल्या शपथेला विरोधाभासी अशी वक्तव्ये केल्याने, आझमी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
म्हस्के यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महापुरुषांचा अपमान करणारे जे कुणी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे समाजातील शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कडक आदेश दिले असून, अशा प्रवृत्तींचे समर्थन करणाऱ्यांना वेळीच ठेचले पाहिजे, पोलिस ठाण्यात डांबले पाहिजे आणि त्वरित कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे गटावरही जोरदार टीका केली. मनसेप्रमाणे आंदोलन करण्यासाठी त्यांच्याकडे लोकसंग्रहच उरलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला त्यांनी इंदिरा गांधी यांच्या घरात गहाण ठेवल्याचा आरोप करत, आंदोलन करण्याआधी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची परवानगी घ्यावी लागते, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसबाबत बोलताना म्हस्के म्हणाले की, काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे आणि दिल्लीसारख्या ठिकाणी त्यांचा सुपडासाफ झाला आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका करताना म्हस्के म्हणाले की, ते आता मतांसाठी लाचार झाले आहेत. ते काय बोलतात यावर आम्ही काही ठरवणार नाही, कारण आम्ही आदित्य ठाकरे यांचे गुलाम नाही. त्यांनी स्वतः सोनिया गांधींची गुलामगिरी पत्करलेली असल्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. उद्धव ठाकरे गटाचा पाठीचा कणा पूर्णपणे मोडलेला आहे आणि मतांसाठी ते लाचारी पत्करत आहेत, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाची भूमिका निष्फळ असल्याचे सांगितले.