उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भर सभागृहात उत्तर
नवी दिल्ली : 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम आज पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि साहित्यिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमात अजित पवार यांनी आधी भाषण केलं. यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या हलक्यात घेऊ नका या वक्तव्याचा उल्लेख केला. “आमच्यात कुठलीही नाराजी नाही. आता परवाच एकनाथ शिंदे यांनी असा शब्द वापरला की, मला हलक्यात घेऊ नका. ते कुणाला म्हणाले तेच कळायला मार्ग नाही. आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही की अजून कुणी घ्यायचं नाही?”, असा सवाल अजित पवारांनी केला. त्यांच्या या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात प्रत्युत्तर दिलं.
“खरं म्हणजे अजित दादा मगाशी म्हणाले की, आपल्या चेहऱ्यावर क्लोज कॅमेरा लावतात ते इथे समोर बसलेले आहेत. मगाशी अजित दादा म्हणाले, हलक्यात घेऊ नका. पण ते अडीच वर्षापूर्वीचं आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचं स्पष्ट केलं.
“थोर सेनानी दिल्लीचे तख्त राखणारे महादजी शिंदे यांना ब्रिटिशांनी देखील ग्रेट मराठा म्हटलं होतं. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला देण्यात आला. तो पुरस्कार मिळावं एवढं थोर काम मी केलं नव्हतं. पण माझी अशी प्रामाणिक भावना आहे की, मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. पण त्या पुरस्काराचा लौकीक वाढेल, असंच काम माझ्या हातून व्हावं, यासाठी हा एकनाथ महाराष्ट्र भूमीच्या विकासासाठी सदैव झटत राहणार एवढंच वचन या ठिकाणी देतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शुभ हस्ते तो पुरस्कार आम्हाला मिळाला. तिथे महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे देखील होते. माझ्यासाठी ती मोठीच गोष्ट होती. पण या पुरस्कारामुळे अनेकांना त्रास झाला. तो त्रास करुन घेणारे कायम माझा तिरस्कारच करत असतात. पण तो तिरस्कारही मला माझ्या पुरस्कारासारखाच वाटतो”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी काही नागरीक सेल्फीसाठी कशाप्रकारे अट्टहास करतात, याचं उदाहरण दिलं. “लोकांचं मन राखण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. मी जिकडे जातो तिकडे सगळे सेल्फीचा आग्रह धरतात. आता मी सगळ्यांना सांगतो की, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री होतो. कॉमन मॅन होतो. आता सेल्फी नाही दिला तर भाव खातो असे म्हणतील. त्यामुळे सगळ्याच जास्त सेल्फी देणारा आणि सर्वात जास्त सह्या करणाऱ्या मुख्यमंत्री म्हणून माझी कारकीर्द झाली. शेवटी आपली जबाबदारी आहे ती पार पाडली पाहिजे. आपल्या एका सहीने कुणाचा जीव वाचत असेल, कुणाचं काम होत असेल तर आपल्याला ते केलंच पाहिजे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.