भाजपच्या जनता दरबाराला साडेतीन दशकांचा इतिहास

नाईकवाडी ते खोपट व्हाया हाऊसिंग सोसायट्या….

ठाणे: ठाण्यात भाजपची जनता दरबाराची संस्कृती साडेतीन दशकांची असून नाईकवाडी येथील कार्यालयापासून आता खोपट येथील कार्यालय आणि आमदार आपल्या भेटीला या विक्रमी उपक्रमांची झालर या संस्कृतीला असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

सध्या जनता दरबार या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण होत असल्याबाबत पत्रकारांनी छेडले असता आमदार संजय केळकर यांनी भाजपच्या ३५ वर्षांच्या जनता दरबाराचा आलेखच मांडला. गेल्या दहा वर्षांत विधान सभेचा सदस्य म्हणून आणि त्या आधी विधानपरिषदेचा सदस्य म्हणून माझ्या कार्यालयात बसून रोज शेकडो लोकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवत आलो आहे. हा जनता दरबारच आहे. गेल्या दहा वर्षात आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम मी राबवत असून मतदारसंघातील एकूण एक गृहसंकुलांमध्ये जाऊन या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवत आहे. आतापर्यंत या उपक्रमाने दीडशेचा आकडा पार केला असून त्याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, सहभाग वाढत आहे. हा उपक्रम देखील जनता दरबारच असल्याचे श्री.केळकर यांनी स्पष्ट केले. सध्या सोमवार आणि शुक्रवार खोपट येथील कार्यालयात मी आणि माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे बसून लोकांच्या समस्या ऐकून त्या विविध पातळ्यांवर सोडवत असतो. यावेळी केवळ ठाणे शहरच नव्हे तर जिल्ह्यातून नागरिक येत असल्याचे श्री.केळकर म्हणाले.

भाजपला अच्छे दिन आल्यानंतरच जनता दरबार हा उपक्रम सुरू झाला, असे नाही तर संपूर्ण देशात भाजपचे अवघे दोन खासदार असताना सुद्धा ठाणे जिल्ह्यात हा उपक्रम आम्ही नाईकवाडी येथील भाजपच्या कार्यालयात १५ वर्षाहून अधिक काळ राबवला, अशी आठवण श्री.केळकर यांनी सांगितली. त्यावेळी खासदार रामभाऊ कापसे, आमदार जगन्नाथ पाटील, भाजपचे पदाधिकारी ॲड. चिंतामण वनगा, अरविंद पेंडसे, वीणाताई भाटिया आणि मी विभागीय अध्यक्ष म्हणून नाईकवाडी येथील कार्यालयात दर मंगळवारी नागरिकांच्या तक्रारी ऐकवून त्या सोडवण्यासाठी बसत असू. हा देखील जनता दरबारच होता. त्यावेळी आम्ही वाडा, मोखाडा, जव्हार पर्यंतचे वाड्या-पाडे पिंजून काढत असू. तेथील समस्या, पाणी टंचाई याबाबत खडानखडा माहिती गोळा करून मंगळवारी कार्यालयात एकत्र बसत असू. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून नागरिक समस्या घेऊन येत. या तक्रारी घेऊन त्याच दिवशी विविध विभागात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करत असू आणि समस्या सोडवत असू. तेव्हाच्या जिल्हाधिकारी जॉयस शंकरन यांच्याशी वारंवार या माध्यमातून भेटी व्हायच्या. ग्रामीण भागातील समस्यांची आमच्याकडे खडानखडा माहिती आणि नोंदी असल्याने जिल्हाधिकारी अथवा अन्य अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटत असे, किंबहुना या माहितीचा प्रशासनाला देखील फायदाच व्हायचा, अशा आठवणी आमदार संजय केळकर यांनी जाग्या केल्या.

लोकांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेणे, त्यातून नागरिकांना दिलासा देणे हा जनता दरबार उपक्रमाचा हेतू असून गेल्या ३५ वर्षांत मी माझ्या कार्यालयात, पक्षाच्या कार्यालयात आणि आमदार आपल्या दारी या विक्रमी उपक्रमाच्या माध्यमातून गृहनसंकुलांमध्ये जनसेवेचा दरबार भरवत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.