कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही – मुख्यमंत्री

ऐरोली येथील कोळी भवनाचे भूमीपूजन

ठाणे: कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. कोळी भवन पुन्हा पुन्हा बांधता येत नाही, यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करा. पैशाची चिंता करण्याची आवश्यकता नाही, निधी कमी पडू देणार नाही, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.

ऐरोली नवी मुंबईतील येथील भूमीपुत्र-प्रकल्पग्रस्त, कोळी-आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नरेश म्हस्के, आमदार मंदा म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील, गणेश नाईक, संदीप नाईक, स्थानिक कार्यकर्ते विजय चौगुले, पंढरीनाथ पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोळी हा दर्याचा राजा आणि मुंबईचा भूमीपूत्र आहे. या वास्तूचा वापर राज्यातील कोळी भूमीपूत्र घेतील. जी-20 चा मुंबईत कार्यक्रम होता तेव्हा जगभरातून लोक आले होते, त्यांनी कोळी गीतांना प्राधान्य दिले होते. कोळी बांधवांची गाणी त्यांचा नाच आणि त्यांचे संस्कृती पाहून परदेशातून आलेले पाहुणे खूष झाले होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, भूमीपूत्रांना न्याय मिळाला पाहिजे. आपल्या सरकारचे एकच सूत्र नोकरीत पहिला भूमीपूत्र. जे प्रकल्प होत आहेत त्यामध्ये कोळी बांधवाचे मोठे योगदान आहे. आज राज्यामध्ये विकास पर्व सुरू झाले आहे. प्रकल्पांना आम्ही चालना दिली.तसेच कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना सुरू केली. महिन्याला १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण” योजना सुरू केली. आपले राज्य देशातील पहिले राज्य आहे की, जे युवकांना प्रशिक्षण भत्ता देत आहे.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर कोळी भवनाचे भूमीपूजन आज झाले आहे. हा भूखंड मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कोळी भवन उभे राहत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. नवी मुंबईतील सर्वांत सुंदर कोळी भवन झाले पाहिजे. निधी कमी पडू दिला जाणार नाही. महाराष्ट्रात अटल सेतू तयार केला तेव्हा मासेमारी करता येत नाही, त्याच्यासाठी आपण कॅपेक्शन देतो म्हणून आपण 25 कोटी रुपये देण्याची तरतूद केली आहे. कोस्टल रोड तयार करतानासुध्दा अशीच अडचण आली होती. कोळी लोकांच्या होड्या समुद्रात जाणे शक्य नव्हते. तेव्हासुध्दा आलेल्या अडचणी आपण दूर केल्या. आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूनी खंबीरपणे उभे आहे.

ते म्हणाले, अठरा हजार कोळी बांधवांना जातपडताळणी नसल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकण्यात येणार होते. त्यांना अधिसंख्य पदावर घेतले.आम्ही त्यांना कायमस्वरुपी कर्मचारी केले. इतर कर्मचारी जे लाभ घेतात ते सर्व लाभ त्यांना आपण दिले. श्री. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर कोळी बांधवाचा प्रश्नाचा विचार झाला. केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रीपद तयार केले. स्वतंत्र खाते तयार केले. मस्यसंपदा योजना सुरू केली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार गणेश नाईक, माजी आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शितपेटीचे वाटप करण्यात आले तसेच प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेतून “फिश ऑन व्हिल्स” वाहनाच्या चाव्या देण्यात आल्या.