एकनाथ शिंदे हे जनतेचे मुख्यमंत्री

राज्यपाल पी सी राधाकृष्ण यांच्या हस्ते योद्धा कर्मयोगी चरित्र ग्रंथाचे शानदार प्रकाशन

ठाणे: सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवन प्रवासात साधर्म्य आहे. अमिताभ बच्चन यांनी आनंद चित्रपटातून सुरुवात केली. नंतर अँग्री यंग मॅन बनून जंजीर, दिवारसारखे चित्रपट केले. शांत संयमी दिसणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळात कोविड योद्ध्यासारखे काम केले. म्हणूनच सुरुवातीला दहा बाय दहाच्या खोलीत राहणारे आणि उदरनिर्वाहासाठी वेळप्रसंगी रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे हे आज जनतेच्या मनातले मुख्यमंत्री ठरले आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल पी.सी. राधाकृष्ण यांनी काढले.

ठाणे येथील राम गणेश गडकरी येथे बुधवारी सायंकाळी प्राध्यापक प्रदीप ढवळ लिखित योद्धा कर्मयोगी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल पी सी राधाकृष्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उप सभापती नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, सा.बां.मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, कोमसापचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार रविंद्र फाटक, साहित्य संमेलन अध्यक्ष रविंद्र शोभणे, पद्मश्री शंकरबाबा पापळकर, लेखक प्रदीप ढवळ, अरुंधती भालेराव, मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते.

पालखीमध्ये चरित्र ग्रंथ ठेवून, त्याची दिंडी व्यासपीठापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते योद्धा कर्मयोगी चरित्र ग्रंथाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर पी. सी. राधाकृष्ण यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत येऊन मला खूप आनंद झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जन्म घेतला नसता तर आपली संस्कृती टिकली नसती. ते महान योद्धा होते, असे राज्यपाल राधाकृष्ण म्हणाले. भारतीय लोकशाही जगातील सर्वात बलवान लोकशाही आहे, असे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी होते. ते तरुणांचे प्रेरणास्थान होते, असे राज्यपाल म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. त्याच जोडीला महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती जपानपेक्षाही मोठी आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले. शंकर बाबा पापळकर यांनीही दिव्यांगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

योद्धा कर्मयोगी हे पुस्तक माझा शेवट नाही. हा तर माझ्या आयुष्याचा केवळ ट्रेलर आहे. चित्रपट अजून बाकी आहे, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. दोन वर्षांपूर्वी सर्वसामान्य माणसाच्या गरजेतून आम्ही सत्ता सोडून एकत्र येत सत्ता स्थापन केली. आमचे काम बघून अजित पवार पण आमच्या बरोबर एकत्र आले. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रपणे राज्याच्या हितासाठी काम करत आहोत आणि पुढेही करीत राहू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून दिली. हा सीएम म्हणजे कॉमन मॅन असल्याचे ते म्हणाले. राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी या प्रकाशन कार्यक्रमाला वेळ दिली त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यपालांचे आभार व्यक्त केले.