विधानसभेसाठी महाविकास आघाडीत तीन फॉर्म्युले?

मुंबई : विधानसभेला अवघे दीड ते दोन महिन्यांचा काळ राहिल्यामुळे जागावाटपाची तयारी सुरु झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मविआत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात जागावाटपाच्या सूत्राबद्दल एकमत झाले आहे आणि त्या फॉर्म्युल्यावर काँग्रेसची भूमिका काय समोर येते? यावर पुढचं चित्र अवलंबून असेल.

मविआचे नेते माध्यमांसमोर फॉर्म्युल्याच्या चर्चा नाकारत असले, तरी सूत्रांनुसार मविआसाठी एकूण तीन फॉर्म्युले ठरले आहेत. पहिला फॉर्म्युला काँग्रेस 96, ठाकरेंची शिवसेना 96 आणि शरद पवारांची राष्ट्रवादीनं 96 जागा लढाव्यात. दुसरा फॉर्म्युला काँग्रेसनं 96 ते 100 जागांवर लढाव्यात, ठाकरेंनी सुद्दा 96 ते 100 जागा, आणि पवारांना 90 ते 96 जागा लढाव्यात. तिसऱ्या फॉर्म्युल्यात काँग्रेस आणि ठाकरेंनी प्रत्येकी 100-100 जागांवर लढावं, आणि पवारांनी 88 जागांवर लढावं, असे ठरू शकते.

दरम्यान, मविआकडून यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा दिला जाणार नाही. निकालानंतर याची चर्चा होईल, असे सांगितले जात आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडूनही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होण्याची शक्यता कमी आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. “चेहरा आणि जागावाटप यावर जाहीर चर्चा करता येणार नाही. यावर बंद खोलीत चर्चा करावी लागेल”, असं चव्हाण म्हणाले. खासदार संजय राऊत यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली. “अभ्यास तिघांचाही पूर्ण झाल्यावर आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू, की कोणी कुठे किती जागा लढवायच्या आणि जो जिंकेल त्यालाच ती जागा मिळेल असं आमचं सूत्र आहे जे लोकसभेला होतं”, असं राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीशी जोपर्यंत विधानसभेच्या जागेबाबत चर्चा होत नाही तोवर आम्ही बोलणार नाही. ज्या त्या पक्षाची तयारी असणे स्वाभाविक आहे. या प्रश्नावर तिसऱ्या पक्षाने बोलणे योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.