ठाणे : ठाणे विभागात भाजप हा प्रमुख पक्ष असून या विभागातील जनताही ताकदीने आपल्या पाठीशी उभी असल्याचे सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
फडणवीस यांच्या या विधानामुळे ठाण्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच वरचढ पक्ष असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यात भाजपचे काम आणखी वाढणार असून यासाठी अशा सुसज्ज कार्यालयाची आवश्यकता होती, असे फडणवीस म्हणाले.
तुम्हाला वाटेल मी ठाण्यात येऊन काही तरी ब्रेकिंग बातमी देईन मात्र मी परिपक्व नेता असल्याचे सांगत त्यांनी निवडणुकीबाबत कोणत्याही प्रकारचे विधान करणे यावेळी टाळले.
ठाणे येथील रेमंड मैदान परिसरात भाजपने दुमजली प्रशस्त ठाणे विभागीय कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटिल, आमदार संजय केळकर, गणेश नाईक, निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे विभागात भाजपचे काम अतिशय सुंदरपणे सुरू आहे. या ठिकाणी मित्रपक्ष देखील वारंवार आपल्यासोबत राहिलेले आहेत. परंतु भाजपचे काम या ठिकाणी मजबुतीने वाढताना दिसून येत असून आजच्या घडीला ठाणे विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष असल्याचे पहायला मिळत आहे. सर्वच ठिकाणी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते दिसत असून आपल्याला विविध निवडणुकांमध्ये चांगले यश मिळत आहे. कारण, ठाणे विभागातील जनताही अतिशय ताकदीने आपल्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे ठाणे विभाग हा भारतीय जनता पक्षाकरीता एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या सगळ्या विभागामध्ये आपले काम हे सातत्याने वाढत असून भविष्यात देखील ते वाढणार असल्याने येथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होते, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान बनवायचे आहे. देशात चारशेचा आकडा पार करायचा असेल तर राज्यात ४० चा आकडा पार करावा लागेल. त्यामुळे पक्षासाठी एक-एक जागा महत्वाची असल्याने कार्यकर्त्यांनी मेहनत करून या जागा निवडून आणायच्या आहेत. मोदी यांची दहा वर्षे म्हणजे ट्रेलर होता, यामुळे चित्रपट अजून बाकी आहे. पुढील पाच वर्षे भारताची भविष्यातील दिशा ठरवणारी असणार आहेत. अशा या परिवर्तनाच्या लढाईचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळत असून ही समाधानाची गोष्ट आहे. विरोधक निराश आहेत. त्यांना काय बोलावे कळत नाही. त्यामुळे देव त्यांना सुबुद्दी देवो, असा टोलाही त्यांनी लगावला. प्रभू श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये भाजपच्या विजयाची गुढी देशात आणि राज्यात उंच उभारा, असेही म्हणाले.
कोणत्याही दानातून हे कार्यालय उभारण्यात आलेले नसून त्याची वाजवी किंमत देण्यात आली आहे. इतर पक्षातील लोक स्वत:ची मालमत्ता करण्याचे काम करतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. या कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनता यांना एक आपुलकीची वागणूक मिळेल. कार्पोरेट कार्यालय बांधून आपल्याला व्यवसाय करायचा नाही. आपल्या व्यवसायात एकच गुंतवणूक आहे, ते म्हणजे जनतेचे प्रेम. जनतेचे आशीर्वाद मिळवण्याकरता जेवढी अधिकाधिक गुंतवणूक आपल्याला करता येईल, तेवढी गुंतवणुक आपल्याला निश्चितपणे करायची आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.