मतदारांची आचारसंहिता !

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्तारूढ पक्ष घोषणांचा सपाटा लावता-लावता, एका पाठोपाठ एक उद्घाटने आणि भूमीपुजनांचे नारळ वाढवत असतो. निवडणुका समीप आल्याचे ते व्यवच्छेदक लक्षण मानले जात असते. मतदारांना प्रभावित करण्यासाठी हा सारा खटाटोप असतो आणि त्यातून आपल्या पारड्यात पडणाऱ्या मतांचा हिशोब सुरु होत असतो. निवडणूक जिंकणे या एकमेव उद्दिष्टाने विजय मेळावे, न्याय यात्रा, संकल्प यात्रा, रोड-शो, मतदारांशी संवाद साधण्यासाठी छोटेखानी सभा-बैठका असा धुमधडाका लावून उमेदवार त्यांची प्रतिमा मतदारांच्या मनपटलावर कोरण्याचा प्रयत्न करीत रहातात. गेल्या काही दिवसांपासून जनता हे सारे अनुभवत आहे. निवडणुकीपूर्वीचा हा माहोल त्यांच्या अंगवळणी पडला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
एकीकडे घराबाहेर हा घटनाक्रम सुरु असताना, चार भिंतींच्या आत माध्यमांद्वारे भिन्न मतप्रवाह तयार होऊ लागले आहेत. राजकारणात प्रचार, आरोप-प्रत्यारोप, आश्वासने, ती पूर्ण न झाल्यामुळे होणारी टीका, उमेदवारांचे चारित्र्यहनन वगैरे मुद्यांनी भारून जात असतो. एकीकडे दररोज कानावर आदळणाऱ्या या गोष्टींवर चर्चा करताना, मतदार स्वतःपुरते काही ‘फिल्टर’ करीत असतात. म्हणजे उमेदवार कार्यक्षम आहे, आणि म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असला तरी चालेल किंवा उमेदवार आदर्श वाटतो, पण पैसे वाटू शकत नाही या कारणास्तव त्याच्यावर अन्याय करण्याचा चुकीचा निर्णय मतदानाच्या दिवसापर्यंत तयार होत असतो. मतदारांच्या हाती दर पाच वर्षांनी चाणक्य होण्याची संधी येत असते. भले त्यांचे निर्णय चुकत असले तरी तो घेण्याच्या स्थितीपर्यंत करावा लागणारा गृहपाठ त्यांच्या परीने ते करीत असतात. मतदारांना ‘माईंड गेम’ खेळण्याची संधी असते आणि त्यामध्ये त्याच्या मनातले कोणालाही कळू नये याची तो व्यवस्थित काळजी घेत असतो. राजकारणावर सुरु असलेल्या चर्चा त्याअर्थी वायफळ नसतात तर उलट पक्ष चुकीच्या अथवा बरोबर निर्णयापर्यंत येण्यासाठी फलदायी ठरत असतात!
प्रस्थापित सरकारच्या विरुद्ध त्यांनी केलेल्या चुकांमुळे ‘अ‍ॅन्टी इन्कम्बन्सी’चे वातावरण तयार होत असते. ते आहे की नाही, हे कळायला तसा मार्ग नसतो. परंतु ते नाही हे ठामपणे सांगण्याची सत्तारुढ पक्षाला गरज असते. त्यातून ‘चार सो पार’चा दावा झाला. सरकारविरुद्ध नाराजी नाही हे ‘ओपिनियन पोल’च्या माध्यमातूनही सांगितले जात असते. त्यात सत्तारुढ पक्षाच्या बहुमताच्या आकड्यांपेक्षा विरोधी पक्ष किती दुबळे आहेत हेही सांगण्याचा प्रयत्न असतो. अनेकदा अशा चाचण्या ‘मॅनेज्ड’ असल्याचे बोलले जात असते. त्याला पुरावा नसतो. परंतु वातावरणनिर्मितीसाठी मात्र त्याचा जरुर फायदा होत असतो. भाजपाने ‘अ‍ॅन्टी-इन्कम्बन्सी’ची लाट निर्माणच होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. ही लाट घरा-दारात, गल्ली-मोहल्यांत, नाक्या-नाक्यांवर होणाऱ्या चर्चाविश्वात पोहोचणार नाही याचे काटेकोर नियोजन पक्षाने केलेले दिसते. माध्यमांवरील जाहीरातीचा सपाटा असो की समाजमाध्यमांचा कल्पक उपयोग, यामुळे मतदारांच्या मनातील नकारात्मक मतप्रवाह दूर तरी होऊ शकतो किंवा वाढूही शकतो. अशा वेळी त्याचा पुर्वानुभव आणि सद्सदविवेकबुद्धी याचा उपयोग तो करु शकतो.
पुढील काही दिवस समाजात प्रचाराचा कल्लोळ होणार आहे. मतदारांना त्याचा ‘आतला’ आवाज ऐकू जाणार नाही याची तजविजही होऊ शकते. या गोंगाटात मतदार त्याच्या अंतर्मनाला भावणारा निर्णय घेतीलच असे नाही. सामुहिक भावनांचा कल्लोळ (‘मॉब हिस्टेरिया’) मनात शिरणार नाही याची काळजी घेतली तर मतदाराला किमान मत वाया गेले नाही याचे तरी समाधान लाभेल. उमेदवार निवडून आला की मत वाया गेले नाही असा गोड गैरसमज परिपक्व म्हणवणारे मतदारही करुन घेत असतात. निवडून आलेला उमेदवार आपल्याला पाच वर्षे न्याय देईल काय याची खातरजमा करायला हवी. आपण आपला विश्वास त्याच्याकडे ‘ठेव’ त असतो, ती ठेव कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित रहायला हवी. व्याज मिळाले तर उत्तम. अशा उमेदवारात पुन्हा विश्‍वासाची गुंतवणूक करायला हरकत नाही.
मतदारांनी त्यासाठी आपली एक आचारसंहिता बनवायला हवी आणि कटाक्षाने पाळायला हवी. ज्याच्या-त्याच्या बुद्धीनुसार निवडणुक आयोग बनून एक आचारसंहिता बनवावी. मन चलबिचल होणार नाही, विचारपूर्वक मतदान करील, भूलथापांना बळी पडणार नाही, मोहाचे क्षण अव्हेरेल आणि तरच लोकशाहीचे गांभीर्य जपणाऱ्या उमेदवाराच्या नावासमोर तो कळ दाबेल. या आचारसंहितेत व्यक्तीगत विकास आणि देशाचे व्यापक हीत, दोन्ही कसे सांभाळले जाईल याची खबरदारी घेतली जाऊ शकेल.
निवडणुकीच्या रणधुमाळीत एक गंमतीदार बातमी वाचनात आली. माणसाचे शेपूट गायब होऊन म्हणे अडीच लाख वर्षे उलटली आहेत. वैज्ञानिकांनी उंदरावर प्रयोग करुन हा निष्कर्ष काढला आहे. माणसाचा मेंदू भलताच विकसित झाला आहे, पण त्याने तो वापरण्याचे बंद केले असा निष्कर्ष निघू नये यासाठी मतदारांनी ‘डोके’ लावूनच मतदान करायला हवे.