राजीव गांधी स्मारकासाठी विक्रांत चव्हाण यांची मुख्यालयात निद्रा

ठाणे: हिंदुस्थानचे पंतप्रधान राजीव गांधी यांचे ठाण्यातील स्मारक गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. पालिका प्रशासनाकडून स्मारक उभारणीसाठी निधी देखील मंजूर झाला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने पालिका मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनासमोर झोपून आंदोलन केले.

ठाणे महापालिका हद्दीत राजीव गांधी यांचे स्मारक व्हावे यासाठी काँग्रेस पक्षाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या स्मारकासाठी काँग्रेस पक्षाने अनेकवेळा पालिका सभागृहात आवाज देखील उठवला. त्यांनतर यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला. मात्र, प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला.

शहर रचना विभागाचे सहायक संचालक सतीश उगीले यांच्या दालनात जाऊन चव्हाण यांनी जाब विचारला. तसेच दहा वर्षांपासून अधिक काळ एकाच जागेवर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत, शहराचा विकास न करता फक्त शहराला एफएसआय वाटत बसण्याचे काम शहर विकास विभाग करत असून फक्त भ्रष्टाचार बोकाळला आहे अशी प्रतिक्रिया विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.