मार्च महिन्यात मुख्य हापूस निर्यातीला होणार सुरुवात

संग्रहित

रमजाननिमित्त आखाती देशात मागणी वाढणार

नवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली असून परदेशात हापूस निर्यातीला सुरुवात झाली आहे. मात्र हापूसचा मुख्य हंगाम अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आवक वाढताच निर्यातीचा वेग वाढणार असून रमजाननिमित्त मागणीत देखील वाढ होणार आहे.

भारतीयांप्रमाणेच परदेशी नागरिकांना देखील हापूसच्या चवीने भुरळ घातली आहे. त्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला परदेशात मागणी वाढत आहे. यंदा आंब्याच्या मुख्य हंगामाला अजून सुरुवात झाली नसली तरी बाजारात दिवसेंदिवस आवक वाढत चालली आहे. सध्या बाजारात १३ हजार रुपयाला पेट्या दाखल होत आहेत. सोमवारी बाजारात ६७१७ तर परराज्यातील ६३४७ अशा एकूण १३ हजार ६४ पेट्या दाखल झाल्या होत्या. बाजारात आंबा दाखल होत असल्याने परदेशात देखील मागणी वाढू लागली आहे. या आंब्यावर प्रकिया करून युरोप आणि आखाती देशात हवाई आणि सागरीमार्गे आंबा निर्यात केला जात आहे. सध्या आखाती देशात आंबा निर्यात होत असून १२ मार्चपासून रमजान महिना सुरू होणार आहे. त्यामुळे आखाती देशात आंब्याच्या मागणीत सरासरीपेक्षा अधिक वाढ होणार असल्याची शक्यता आहे. तर आता आवक होत असलेल्या आंब्यापैकी १० ते १५ टक्के आंबा निर्यात होत आहे, अशी माहिती येथील आंबा विक्रेत्यांनी दिली.

परदेशात पाठवण्यात येणाऱ्या आंब्याला अनेक कसोटीतून जावे लागते आणि कोकणातील आंबे या कसोटीत खरे उतरतात. त्यामुळे या आंब्याला परदेशात अधिक मागणी असते. मात्र वातावरणात अजून गारवा असल्याने हापूस आंब्याची वाढ हवी तशी होत नाही. त्यामुळे आता मार्च महिन्यातील उन्हामुळे आंब्याची वाढ चांगली होणार असून बाजारात आवक देखील वाढणार आहे. आवक वाढताच परदेशात हापूस निर्यातीला सुरुवात होणार आहे. (मोहन डोंगरे, फळ विक्रेते व निर्यातदार, एपीएमसी)