कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिपत्याखाली स्मार्ट सिटीने कल्याणमधील गौरी पाडा येथे सिटी पार्कची निर्मिती केली आहे. सिटी पार्कच्या या कामाला 2018 ला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून गेल्या चार महिन्यापासून तब्बल पाच वर्षाचा कालावधीनंतर देखणे सिटी पार्क लोकार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. सुमारे एक लाख एकवीस हजार 600 चौरस मीटर जागेत नागरिकांकरिता विविध सुविधांनी सदरहू पार्क पूर्णत्वास आलेले आहे.
कल्याण स्मार्ट सिटीच्या नियंत्रणाखाली उभारण्यात आलेल्या या प्रकल्पावर सुमारे 70 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सिटी पार्कमध्ये लॉन, अँम्फी थिएटर, फूड कोर्ट, प्रदर्शन केंद्र, फोर व्हीलर पार्किंग जागा, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, तलाव, गॅलरी, बहुउद्देशीय केंद्र, पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र प्रसाधन गृह या सिटी पार्कमध्ये उभारण्यात आले आहे. सिटी पार्कच्या प्रांगणात 1200 विविध प्रजातीचे झाडे लावल्याने या झाडांवर परदेशातील पक्षी देखील वास्तव करून राहत आहेत.
सिटी पार्कमध्ये नागरिकांसाठी बसण्याकरता स्टेप बसविण्यात आल्याने सुशोभीकरणाची नजाकत लेझर शो द्वारे पाहण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सिटी पार्कमध्ये विविध कार्यक्रम देखील घेण्याकरता नियोजन करण्यात आले असल्याने यामुळे पालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत्र देखील वाढण्यास मदत होणार आहे.
सिटी पार्क पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पार्कमध्ये तयार करण्यात आलेल्या विविध वास्तू पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सायंकाळच्या सुमारास रंगबेरंगी रोषणाईमुळे तलावामध्ये दिसणाऱ्या नवरंगातील पाण्याने पर्यटकांची मने प्रफुल्लित होणार आहेत.
कल्याण शहरात बनविण्यात आलेल्या सिटी पार्कमुळे वेगळे वलय निर्माण होणार असल्याने या पार्कमध्ये 80 फोर व्हीलर वाहने पार्किंग करता स्वतंत्रपणे उभी राहणार आहेत. सिटी पार्कचे काम पूर्णत्वास येऊन तीन ते चार महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. सिटी पार्कमधील लॉन व झाडांची देखरेख करणे, परिसरातील स्वच्छता राखणे, बनवलेल्या स्ट्रक्चरची दैनंदिन साफसफाई करणे, व संपूर्ण क्षेत्राच्या सुरक्षेकरिता सुरक्षारक्षक तैनात करावे लागणार आहेत. याबाबतचा पत्रव्यवहार स्मार्ट सिटी विभागाने पालिकेकडे केला असल्याची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने यावेळी दिली आहे.
देखभाल दुरुस्तीकरता पालिकेच्या मालमत्ता विभागामार्फत निविदा प्रक्रिया काढली जाणार असल्याचे स्मार्ट सिटीकडून सांगितले गेले असून याबाबत महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांना विचारणा केली असता निविदा स्मार्ट सिटी काढणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्णत्वास येऊनही ते मात्र लोकार्पणाच्या प्रतिक्षेत अडकल्याचे दिसून येत आहे.