ठाणे : दिवाळीनिमित्त मिठाई दुकानात वाढती गर्दी लक्षात घेता, ठाणे महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग नियंत्रण विभागामार्फत ‘क्षयमुक्त ठाणे-भयमुक्त ठाणे’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व मिठाई दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे टीबी स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.
डिजिटल एक्स-रे मशीनमुळे तत्काळ त्या आजाराबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये ज्या दुकानांमध्ये कर्मचाऱ्यांची स्क्रिनिंग होईल त्या दुकानांना ‘टीबी फ्री शॉप’चे स्टिकर लावण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षी क्षयरोग आजाराचे ८,५०० हून अधिक रुग्ण वर्षभरात आढळले होते. त्यात १४ जणांचा मृत्यूही झाला होता. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत ७५५६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात या आजाराने पाच जणांचा मृत्यु झाला असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
येत्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्याअनुषंगाने मिठाईच्या दुकानात गर्दी वाढणार आहे. ग्राहकांची शहरातील नामांकीत दुकानात मिठाई घेण्यासाठी गर्दी होणार आहे. परंतु मिठाई घेत असतांना त्या ठिकाणाहून आजार तर ग्राहक घरी घेऊन येत नाहीत ना? याची काळजी महापालिकेचा आरोग्य विभाग घेणार आहे.
बुधवारपासून शहरातील दुकानातून क्षयरोग आजाराचे रुग्ण शोधण्याची किंबहुना पुढील धोका टाळण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी आठ जणांची टीम सज्ज झाली. मोहिमेंतर्गत दुकानातील कर्मचाऱ्यांचे त्याच ठिकाणी एक्स-रे काढले जात आहेत. डिजीटल एक्सरे मशिन असल्याने त्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या आजारबाबत माहिती दिली जात आहे.
क्षयरोग हा आजार संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले असेल तर ग्राहकांचेही आरोग्य चांगले राहणार आहे. त्या अनुषंगाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच ज्या ज्या दुकानांची पाहणी होईल, त्या ठिकाणी ‘टीबी फ्री शॉप’असे स्टीकर लावले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी, क्षयरोग विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद पाटील यांनी दिली.