राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे प्रतिपादन
ठाणे: आम्ही सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. अपात्रतेबाबत कायद्याच्या चौकटीच राहून निर्णय होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. दिवाळीपूर्वी मी स्वतः आणि दिवाळीनंतर अजित पवार हे राज्यव्यापी दौरा करणार असल्याची घोषणा देखील यावेळी तटकरे यांनी केली.
राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, खा. सुनिल तटकरे हे ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. भाजप, शिवसेना यांच्याबरोबर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या विकासाच्या तळमळीतून सत्तेत सहभागी झाला आहे. पण सत्तेत सहभागी होताना शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा आम्ही अजिबात सोडलेली नाही किंवा धर्मनिरपेक्षताही सोडलेली नाही. सत्तेत आल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांची कास धरणारे घेतलेले गतीमान निर्णय याची साक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मान्यतेचा दावा निवडणूक आयोगाकडे दाखल झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा घटनात्मक दर्जा मान्य केला आहे. निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. त्याचा सर्वांनी सन्मान करायला हवा, असेही तटकरे म्हणाले.
महायुती म्हणूनच लोकसभेची निवडणूक लढवणार
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष, महाराष्ट्रात मिशन ४५ + मोहीम राबविणार आहे. तीनही पक्षाचे राज्य आणि केंद्रस्तरीय नेते महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा एकत्रित निर्णय घेणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊनच जागा वाटपाचा निर्णय घेतील, अशी माहिती तटकरे यांनी यावेळी दिली.