उलटसुलट चर्चेवर आ. कथोरे यांनी टाकला पडदा
बदलापूर: गेल्या 20 वर्षांपासून मुरबाड विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडणूक लढवली आहे. विकास कामे करून नागरिकांची मने जिंकली आहेत. आता दुसऱ्या मतदार संघातून निवडणूक लढवूच शकत नाही. लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त खोडसाळ आणि निराधार आहे, असे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी केले.
कल्याण लोकसभा मतदार संघातून आमदार कथोरे निवडणूक लढवणार असल्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावर श्री.कथोरे यांनी स्पष्टीकरण देत उलटसुलट चर्चेवर पडदा टाकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात उत्तमरीत्या कार्यरत आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत मी कल्याण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळ आहे. कल्याण आणि भिवंडी यापैकी कुठूनही लोकसभा निवडणूक लढवणार नाही. कुणीतरी जाणूनबुजून कपोलकल्पित बातम्या देण्याचे उद्योग करत असल्याचा आरोप आमदार कथोरे यांनी केला.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी याप्रकरणी दखल घेतली आहे. असे प्रकार त्वरित थांबवले जातील. एकत्र बसून मार्ग काढला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे आमदार कथोरे म्हणाले.
पूर्वी निवडणूक लढवली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाद, भांडणे होती, ती भांडणे सामंजस्याने सोडविली. त्याठिकाणी परिवर्तन घडवले, हे त्याठिकाणचे नागरिक मान्य करतात, याबाबत एका कार्यक्रमात केलेल्या भाषणाचा विपर्यास केला. झालेल्या प्रकारामुळे कार्यकर्ते नाहक भरडले जातात, ही बाब वेदनादायी आहे. मी आजही जमिनीवर चालणारा कार्यकर्ता असून मुरबाड मजबूत करणार. ज्या मतदारांनी चार वेळा आमदार म्हणून निवडून दिले तो मतदारसंघ मजबूत का करू नये, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी उत्तम विशे, मिलिंद धारवाडकर, साकीब गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.