समतानगरच्या ४५० कुटुंबाना तीन वर्षांत मिळणार मालकीची घरे

पुनर्वसन प्रकल्पासाठी ऑगस्टपूर्वी निविदा काढणार

ठाणे : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या समतानगर पुनर्वसन प्रकल्पाच्या कामासाठी ऑगस्टपूर्वी निविदा काढण्यात येणार आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. येत्या तीन वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून येत्या तीन वर्षात ४५० कुटुंबाना ३२३ चौरस फुटांची मोफत घरे मिळणार आहेत.

खाजगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात यासंदर्भात आमदार सरनाईक आणि पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यात एक महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीत या प्रकल्पाची व्यवहार्यतः किती आहे यासंदर्भात क्रिस्टल या संस्थेच्या वतीने पालिका आयुक्तांसमोर सादरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर सात दिवसांत यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी क्रिस्टलला दिले होते. सात दिवसानंतर शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा आमदार सरनाईक यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ऑगस्टपूर्वी या प्रकल्पाच्या निविदा काढण्यात येतील अशी माहिती त्यांनी या बैठकीनंतर दिली आहे. विशेष म्हणजे ही घरे नागरिकांना मोफत मिळणार असून सर्व लाभार्थीना घरे त्यांच्या नावावर करून देण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

दोन बाथरूमची व्यवस्था असलेले वन बिएचके असे या घरांचे स्वरूप असणार आहे. क्रिस्टलने दिलेल्या अहवालानुसार हा प्रकल्प पूर्णतः व्यवहार्य असून यामध्ये विकासकाला देखील फायदा होणार आहे.

समतानगरमधील राजीव गांधीनगर, आनंदराम नगर, मिलिंद हाऊसिंग सोसायटी तसेच लोकमान्यनगरमधील सिध्दिविनायक सोसायटी या परिसरातील सर्व रहिवाशांनी सन १९९७ साली ठाणे महानगर पालिकेच्या रस्ता रूंदीकरणासाठी स्वत:च्या घरांची जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे पुनर्वसन रखडले आहे. तात्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वर्तकनगर येथील बिल्डींग नं. ५४,५५,५६ च्या रहिवाश्यांचे ज्याप्रमाणे पुर्नवसन करण्यात येत आहे,त्याचप्रमाणे समता नगर, लोकमान्य नगर येथील चाळींचे पुर्नवसन देखील पी.पी.पी. तत्वावर करण्याचे आदेश देवून ५ वर्षाचा कालावधी लोटला आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी सज्जा कोसळून दुर्घटना घडली होती सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी महानगरपालिकेने त्वरीत उपाय योजना करावी, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती .या पुनर्वसन प्रकल्पासाठी त्यांनी पालिका आयुक्तांची वेळोवेळी भेट घेऊन यासंदर्भातील पाठपुरावा देखील सुरु ठेवला होता.

म्हाडाची २४६ घरे उपलब्ध
या पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर या रहिवाशांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र यासाठी म्हाडाची २४६ घरे आधीच उपलब्ध करण्यात आली आहे. उर्वरित घरे लवकरच उपलब्ध होणार असून यासंदर्भात एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बोलणे झाले असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तात्पुरत्या स्थलांतराचा प्रश्न सुटल्याने या प्रकल्पाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.