भाईंदर: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

ठाणे: पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक आदी कामांमुळे महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकावर आले आहे. राज्याच्या हितासाठी व सर्वसामान्याच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी हे शासन काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

मीरा-भाईंदर महानगर पालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आमदार भरत गोगावले, बालयोगी सदानंद महाराज, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त दिलीप ढोले आदी उपस्थित होते.

यावेळी मिरारोड (पू.) येथील आरक्षण क्र. २४८ येथील सद्गुरू सदानंद महाराज सभागृह व कै. हरिचंद्र आमगांवकर जिमनॅस्टीक सेंटर या इमारतीचे भूमिपूजन, केंद्र शासनाच्या हवेची गुणवत्ता सुधारणा निधीमधून प्राप्त विविध कामांचे लोकार्पण, आमदार निधीतील आरोग्य तपासणी व्हॅनचे लोकार्पण, शहरातील महानगरपालिकेच्या निधीतील व शासनाच्या निधीतील सिमेंट क्राँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन, महापालिकेची सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर आधारित वाढीव मुख्य जलवाहिन्या व वितरण व्यवस्था भूमिपूजन, महानगरपालिकेची भुयारी गटार योजना टप्पा- २ (भाग-१), नगर विकास विभागाकडील मुलभूत सोई सुविधांचा विकास या योजनेतील विविध कामांचे भूमिपूजन, भाईंदर (पूर्व) इंद्रलोक आरक्षण क्र. ११५ मधील शाळा इमारतीचे लोकार्पण. काशिमिरा येथील प्रभाग समिती क्र.०६ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे इमारतीचे लोकार्पण. भाईंदर (प.) रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार लोकार्पण. किल्ले घोडबंदर प्रवेशद्वार लोकार्पण, माणिकपुर पोलीस ठाणे नुतन इमारतीचे लोकार्पण आदी कामांचे आज लोकार्पण व भूमिपूजन झाले.

यावेळी राज्य शासनाच्या वर्षपूर्ती निमित्त काढण्यात आलेल्या गाण्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच महिला बचतगटांना विविध व्यावसायिक साहित्याचे वाटपही मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मीरा भाईंदर हे शहर मुंबई व ठाणे शहराच्या बरोबरीने पुढे यायला हवे. यासाठी येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. भाईंदर ते दहिसर लिंक रोडचे काम हाती घेणार आहे, त्यामुळे येथील नागरिकांचा टोलचा प्रश्न मिटेल. तसेच मुंबई सागरी किनारा मार्गही विरार ते थेट पालघर पर्यंत नेण्यात येणार आहे. तसेच बांद्रा-वर्सोवा आता विरारपर्यंत आणणार आहे. तसेच मेट्रोच्या जाळ्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.