डाॅ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी
ठाणे: देशात अराजकता माजवण्याचा आणि देशाला बदनाम करणाऱ्या ‘केरळ स्टोरी’ या सिनेमाच्या निर्मात्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे हे देखील उपस्थित होते.
डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दिल्लीमध्ये कधीही गेलात; कुठल्याही कार्यालयात जा, कुठल्याही मंत्रालयात, कुठल्याही मंत्र्यांच्या कार्यालयात जा; चार खासगी सचिवांमधील एक खासगी सचिव हा “मल्लू” असतो. म्हणजेच तो केरळमधून आलेला असतो. आज केरळ भारतातील पूर्ण साक्षर राज्य म्हणून पुढे येतंय. आज तिथे ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम हे तिघेही संख्येने कमी अधिक प्रमाणात सारखेच असले तरी तिथे कधीही टोकाचे जातीयवाद झाल्याचे दिसत नाही. आजमितीला तिथे बालमृत्यूचा दर फक्त सहा आहे. उलट उत्तर प्रदेशात 46 आहे. दूरदेशातून जे परकीय चलन भारतात येते. त्यातील 36 टक्के चलन हे केरळमधील परदेशी असलेले अनिवासी भारतीय पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.34 लाख कोटी रूपये पाठविले होते.दरडोई उत्पन्न हे भारताच्या सरासरीपेक्षा 60% अधिक आहे. याचा अर्थ तेथील माणूस हा इतर राज्यातील नागरिकांपेक्षा श्रीमंत आहे. दारिद्रय़रेषेखालील भारताची सरासरी जेव्हा 22 आहे. तेव्हा तिथे फक्त 0.76 लोकं हे दारिद्रय़रेषेखाली आहेत. समुद्र किनाऱ्याचा विकास सर्वाधिक केरळने केला आहे. खाडीमध्ये पर्यटन ही संकल्पनाच केरळमधून आलीय. अशा केरळला आणि आपल्या देशाला बदनाम करण्यासाठी केरळ स्टोरी हा सिनेमा आता प्रदर्शित झाला आहे, असा आरोप आ.आव्हाड यांनी केला.
32 हजार मुलींचे धर्मांतर किंवा पलायन हा निव्वळ खोटारडेपणा आहे. कारण अधिकृत आकडा फक्त तीन आहे. नंतर सिनेमा काल्पनिक होता म्हणून आपण 32 हजार मुलींनी धर्मांतरण केले, असे कोर्टात सांगतात. अशावेळेस बोलताना आपण त्याला फाशी दिली पाहिजे, असे म्हटले. त्याचा शब्दशः अर्थ घेऊन अनर्थ करण्यात आला. या एका वाक्यावर वाद निर्माण करायचे, असे प्रकार करण्यात येत आहेत, असेही श्री. आव्हाड यांनी स्पष्ट केले.