यंदा जुन्नर हापूस आंब्याचे उत्पादन घटणार

अवकाळी पावसाचा फटका आंब्याला फटका

नवी मुंबई: कोकणातील आणि दक्षिण भारतातील हापूस हंगाम संपता-संपता वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात मे अखेर किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जुन्नर हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र मागील चार पाच दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने तसेच पुणे-जुन्नर मधील आंबेगाव याठिकाणी झालेल्या गारपीटीने २५टक्के आंबेगळ झाली आहे. त्यामुळे यंदा उत्पादनावर परिणाम होणार आहे.

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात में अखेर कोकणातील हापुसचा हंगाम संपताच जूनच्या सुरुवातीलाच जुन्नर हापूस आणि केशर आंबा हंगाम सुरू होतो. जुन्नर येथील हापूस तयार होण्याच्या प्रक्रियेत आहे. परंतु ऐन हंगामात अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने उत्पादनाला फटका बसला आहे, अशी माहिती आंबा शेतकरी सत्यवान गायकवाड यांनी दिली आहे.

पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाण्यात गेला आहे. २५टक्के आंबेगळ झाली आहे. गळून पडलेल्या आंब्यात कीड तयार होते आणि खराब होतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून आंब्यासाठी केलेला खर्च देखील भरून निघण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे यंदा ऐन हंगामात आंब्याचे उत्पादन घटणार आहे.

फळ बाजारात मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जुन्नर हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र यंदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने आंबेगळ झाली असून २५टक्के उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे यंदा जुन्नर हापूस हंगामाला विलंब होणार असल्याची माहिती आंबे विक्रेते संजय पिंपळे यांनी दिली.