महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी

स्वच्छतेसाठी सरसावले श्रीसदस्यांचे हजारो हात

शहापूर: थोर निरूपणकार, तीर्थरूप डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला असून सदर कार्यक्रम खारघर येथे होणार असून या कार्यक्रमस्थळाच्या स्वच्छतेसाठी हजारो श्रीसदस्यांचे हात एकवटले आहेत.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी १६ एप्रिल रोजी सिडको पार्क, सेक्टर ३० खारघर, नवी मुंबई येथे सकाळी १०.३० वाजता यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशेष लक्ष देऊन आहेत.

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अनेक वर्षांपासून डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले.त्याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवानंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात.

बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या. आदिवासी वाडी, वस्त्यांवर साक्षरता अभियानासह व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. दरम्यान डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचे वटवृक्ष करण्याचे कार्य आप्पासाहेबांनी केले आहे. त्यांचे हेच कार्य त्यांचे चिरंजीव डॉ.सचिनदादा धर्माधिकारी करत आहेत. दासबोधावरील निरुपणाद्वारे श्रवण बैठका महाराष्ट्र राज्य व राज्याबाहेर कानाकोपऱ्यात होत आहेतच, शिवाय देशातील सर्व राज्ये आणि जगातील बहुतांश देशात हे कार्य सुरू आहे. अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

लाखो श्रीसदस्य उपस्थित राहणार
हा पुरस्कार एका अतुलनीय व्यक्तिमत्वाला दिला जाणार असल्याने या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो श्रीसदस्य उपस्थित राहणार आहेत. स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह तसेच आरोग्य सुविधा या व्यवस्थेकडे प्रशासनाला विशेष लक्ष देण्याची आवश्यकता भासणार आहे. दरम्यान हे श्री सदस्य कमालीचे शिस्तबद्ध असल्याने कार्यक्रम झाल्यानंतर येथे कोणत्याही प्रकारचा कचरा दिसणार नाही तसेच पोलीस प्रशासनावर देखील तितकासा ताण पडणार नाही असे जाणवते.