रस्त्यांच्या दर्जाचे पितळ उघडे; खारटन रोडला मोठे भगदाड !

दुरुस्ती होईपर्यंत वाहतूक वळवली

ठाणे : नवीन रस्त्यांच्या कामाचे आयआयटीकडून लेखापरीक्षण होत असतानाच काल रात्री ठाणे कॉलेजसमोरील खारटन रोडवर दहा फूट खोल खड्डा पडल्याने संपूर्ण वाहतूक तातडीने बंद करण्यात आली. एकीकडे नवीन रस्त्यांची तपासणी होत असतानाच दुसरीकडे जुन्या रस्त्यांच्या लेखापरिक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे

तर जुन्या मलनिस्सारण चेंबर दुरुस्ती कामामुळेच खारटन परिसरातील रस्ता खचल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या विभागाने याठिकाणी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. हे काम होईपर्यंत हा मार्ग वाहतूकीसाठी बंद राहणार असून या मार्गावरील वाहतुक पर्याय मार्गांवरून वळविण्यात आली आहे. ठाणे पश्चिम स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या बसगाड्यांना कळवा येथील क्रीकनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला असून यामुळे बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. तर, हलकी वाहने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, बाजारपेठ मार्गे स्थानकाच्या दिशेने सोडण्यात येत आहे.

ठाणे येथील खारटन परिसरातील रस्ता हा पश्चिम रेल्वे स्थानक आणि कोपरी भागातील वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. या मार्गावर कळवा, कोपरी, साकेत, कशेळी आणि काल्हेर च्या दिशेने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. शेअर रिक्षा आणि बसची या मार्गावरून वाहतूक सुरु असते. सोमवारी रात्री या मार्गावरील ठाणा कॉलेज जवळील शीतला माता चौक परिसरात रस्ता खचून त्याला मोठे भगदाड पडले. हा प्रकार पाहून स्थानिकांनी तात्काळ मार्गरोधक लावून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. या रस्त्याखाली असलेली मलनिस्सारणची वाहीनी खुप जुनी असून परिसरात मलनिस्सारणाचे पाणी तुंबत होते. याबाबत तक्रारी येऊ लागल्याने पालिका अधिकाऱ्यांनी त्या परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी खारटन रस्त्यावरील मलनिस्सारण चेंबरची माती खचत असल्याने हा प्रकार घडत असल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली होती. यानंतर पालिकेने चेंबर दुरुस्तीसह वाहीनी बदलण्याचे काम हाती घेतले होते. हे काम सुरु असतानाच, लगतच्या रस्त्याखालील माती खचली आणि त्यामुळेच रस्त्याला मोठे भगदाड पडले. या घटनेनंतर स्थानिकांनी या मार्गवरील वाहतूक बंद केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षात लुईसवाडी, सावरकरनगर आदी भागात रस्ते खचल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या घटनांनी जीवितहानीची भीतीही व्यक्त होत आहे. नवीन रस्त्यांबरोबरच प्रमुख जुन्या रस्त्यांचे लेखापरिक्षणही या आयआयटी पथकामार्फत करण्यात यावे, अशी मागणी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केली आहे. ठाणे शहरात यापुर्वी सात ठिकाणी अशाचप्रकारे रस्ता खचण्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु अशा घटना सातत्याने घडू लागल्याने त्याकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्यांचे लेखापरिक्षण केले तर शहरात रस्ता खचण्याच्या घटना रोखण्याबरोबरच संभाव्य जिवीतहानी टाळणे शक्य होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.