शहापूर तालुक्यात सेंद्रिय पद्ध्तीने होते लागवड
शहापूर: राज्यात पूर्वी काही पिकांची विशिष्ट भागातच लागवड केली जात असे.आता मात्र पीक पद्धतीत बदल होत असून सांगली-सातारा, विदर्भ, मराठवाडा भागात घेतल्या जाणाऱ्या हळदीची लागवड आता कोकणातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पाहायला मिळत आहे.
पूर्वी किचकट मानले जाणारे हळद उत्पादन आता शेतकऱ्यांना लोखोंचे उत्पन्न देत आहेत. शहापूर तालुक्यातील बेंडेकोन येथील शेतकरी रामनाथ उंबरगोंडे यांनी सुरवातीला अर्धा एकर जागेमध्ये प्रगती जातीच्या हळदीची लागवड केली असून सर्व खर्च वजा करून त्यांना दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. टेंभा येथील शेतकरी प्रकाश कोर यांनी 10 गुंठ्यात वायगाव जातीच्या हळदीची लागवड केली असता सर्व खर्च वजा जाऊन त्यांना एक लाख रुपये उत्पन्न मिळाले.
पूर्वी हळद काढणीची प्रक्रिया अवघड असल्याने शेतकरी लागवडीला कचरत असत.नवखे शेतकरी हळदीचा विचारही करत नव्हते. आता मात्र ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पुढे सरसावले असून हळदीची पिके घेत एकरी आठ ते दहा लाख रुपयांचेही उत्पन्न घेत आहेत. हळद ही शेतावर अंतरपीक म्हणून घेता येते. हळदीच्या काढणीसाठी लागणारे मनुष्यबळ, काढणी झाल्यावर शिजविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागणार लाकूड-फाटा तसेच सदर हळद सुकवून पुन्हा मशीनमध्ये तिची पावडर बनवून ती पॅकिंग करून विक्रीसाठी बाजारात आणली जाते. सदर हळद ही पूर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे तीला बाजारात एका किलो मागे 400 ते 500 रुपये भाव मिळत आहे. पुढील काळात ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळद लागवड होऊन शेतकऱ्यांना जोड धंदयासोबत चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात घेतले जाणारे हळदीचे पीक आपल्या कोकणातही उत्तम प्रकारे येत असून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यास चांगला भाव देखील मिळत आहे. भात उत्पादनाला जोड धंदा म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हळद लागवड करावी, असा सल्ला टेम्भा येथील शेतकरी प्रकाश कीर यांनी दिला आहे.
शहापूर तालुक्यात उन्हाळी आणि पावसाळी भात पीक घेतले जाते, परंतु त्या सोबत हळद पीक घेतल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. कृषी विभागामार्फत अनुदानही मिळते, अशी माहिती बेंडेकोन येथील शेतकरी रामनाथ उंबरगोंडे यांनी दिली.