पाणीपट्टी थकलेल्या ४४३० नळजोडण्या वर्षभरात तोडल्या

बील भरण्यासाठी अखेरचे तीन दिवस

ठाणे : जल देयके थकविणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कारवाई केली असून एप्रिल-२०२३ ते मार्च-२०२४ या काळात ४४३० नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणी बील भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. जे ग्राहक थकबाकी आणि चालू बिल भरणार नाहीत, त्यांच्या नळ जोडण्या तोडण्याची कारवाई एक एप्रिलपासून सुरू करण्यात यणार आहे.

ठाणे महापालिकेला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण २०१ कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ११४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ज्या ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वर्षाची पाणी देयके जमा केलेली नाहीत, त्यांनी ३१ मार्चपर्यंत सगळी देयके जमा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जे घरगुती नळ संयोजन धारक ३१ मार्च २०२४पर्यंत थकीत पाणी बील, चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील, त्यांना त्या थकित बिलावरील प्रशासकीय आकारातून १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना ज्यांनी देयके यापूर्वीच जमा केली आहेत त्यांना, तसेच व्यावसायिक नळ जोडणी धारकांसाठी लागू नाही.

प्रभाग खंडित जोडण्या
मुंब्रा ९०५
कळवा ७९६
नौपाडा-कोपरी ६८२
वागळे ६६०
दिवा ५५३
लोकमान्य-सावरकर नगर ३९८
उथळसर २८३
वर्तकनगर ८९
माजिवडा-मानपाडा ६४
एकूण ४४३०

प्रभाग देयक वसुली टक्के
वर्तकनगर ७१.५८
माजिवडा-मानपाडा ६६.६१
लोकमान्य-सावरकर नगर ६५.९७
उथळसर ६४.२४
नौपाडा-कोपरी ६१.४३
मुंब्रा ५०.६२
कळवा ५५.३३
वागळे ३९.८१
दिवा ३६.८५
एकूण ५६.६१