घणसोली भागातील ३० नामनिर्देशन अर्ज तांत्रिक कारणांवरून बाद

उमेदवाराकडून न्यायालयात मागण्यात येणार दाद

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणूक २०२५-२६ साठी घणसोली येथून उमेदवारी अर्ज सादर करणारे सामाजिक कार्यकर्ते दिनेेश म्हात्रे यांचा नामनिर्देशन अर्ज छाननी दरम्यान तांत्रिक कारणांवरून अवैध ठरवण्यात आला आहे. सत्ताधारी उमेदवारांना फायदा व्हावा म्हणून आमचे अर्ज हुकूमशाही पद्धतीने नाकारण्यात आल्याचा आरोप करत निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात आता न्यायालयात दाद मागणार असल्याचे दिनेश म्हात्रे यांनी सांगीतले.

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता अनेक इच्छुकांनी शेवटच्या दिवसांपर्यंत आपले अर्ज दाखल केले होते.अर्ज छाननीवेळी ११७, अर्ज अवैध ठरण्यात आले. यात उमेदवारी अर्जातील काही कॉलम अपूर्ण राहणे तसेच दुरुस्तीच्या ठिकाणी सही नसणे ही कारणे पुढे करून अर्ज नाकारण्यात आला. मात्र, ही त्रुटी तांत्रिक स्वरूपाची असून उमेदवाराची पात्रता, ओळख किंवा निवडणूक लढविण्याचा हक्क यावर कोणताही परिणाम करणारी नाही, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

“लोकशाही ही तांत्रिक चुका शोधून उमेदवारांना बाद करण्यासाठी नसून जनतेला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आहे. अर्ज छाननी दरम्यान अशा त्रुटी दुरुस्त करण्याची संधी देणे ही निवडणूक प्रक्रियेची भावना आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र सदर बाब ही सत्ताधाऱ्यांना पोषक ठरावी म्हणून आमचे अर्ज अवैध ठरवले असून घणसोली भागातील एकूण ३० जणांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकाराचा वापर करून बाद केले आहेत. त्यामुळे आमच्यावर केलेल्या अन्यायाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी माहिती दिनेश म्हात्रे यांनी दिली.