अहमदाबादमध्ये विमान कोसळून २४१ प्रवाशांचा मृत्यू

देश हादरला, जगभरात हळहळ

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली असून तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. यात २४१ प्रवासी मृत्युमुखी पडले असून एकमेव प्रवाशाचा जीव वाचला आहे. या दुर्घटनेने अवघा देश हादरला असून जगभरात हळहळ व्यक्त होत आहे.

एअर इंडियाच्या १७१ क्रमांकाच्या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या ३० सेकंदात म्हणजे ६२५ फूट उंचावरून कोसळले. या दुर्घटनेनंतर काही वेळातच तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. या विमानात २३० प्रवासी, दोन पायलट आणि १० केबिन क्रू यांचा समावेश होता. प्रवाशांमध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक, सात पोर्तुगाल नागरिक आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. मृतांमध्ये ११ मुले आणि दोन नवजात बालकांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. देशात आजवर झालेल्या विमान अपघातांपैकी हा मोठा अपघात असल्याचे कळते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून, जिथे प्लेन क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे, घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झाले आहेत. अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला.

विशेष म्हणजे विमान दुर्घटनेपूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी आपत्कालीनचा संदेश दिला होता. कॅप्टन सभरवाल यांना तब्बल 8200 तासांच्या प्रवास उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने दुपारी 1.31 वाजता उड्डाण केल्यानंतर 1.38 मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर, ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयातील 15 डॉक्टर जखमी झाले असून काही रुग्णांना देखील गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 या विमानातील प्रवासी क्षमता 300 एवढी आहे.

को पायलट दीपक पाठक बदलापूरचा!

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत बदलापुरातील रहिवाशी आणि एअर इंडिया फ्लाईटचा को पायलट असलेल्या दिपक पाठक (३२) याचा देखील समावेश असून, घटना समजताच त्याच्या घरी मित्र परिवाराची रीघ लागली आहे.

ही घटना घडल्यानंतर या घटनेची माहिती बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील रावल कॉम्प्लेक्स या त्याच्या राहत्या घरी आणि त्याच्या मित्र परिवाराला कळताच, त्यांना दुःख अनावर झाले आहे. या घटनेनंतर त्याच्या घरी मित्र परिवाराची गर्दी झाली आहे. दरम्यान फ्लाईट लंडनसाठी टेक ऑफ करण्यापूर्वी दुपारी दिपकचे त्याच्या आईशी फोनवरून बोलणे झाले होते. त्यानंतर कुटुंबातील कोणाचाही दीपकशी काही संवाद झालेला नाही. दिपक गेल्या ११ वर्षांपासून एअर इंडियामध्ये नोकरीला होता. त्याच्या कुटुंबात दोन विवाहित बहिणी, आई-वडील आणि तो असा त्यांचा परिवार आहे. घटना घडल्यानंतर अजूनही एअर इंडिया किंवा प्रशासनाकडून दिपकच्या मृत्यूबाबत ठोस माहिती मिळाली नसून, आत्ताही त्याच्या फोनची रिंग होत असून, दिपक जिवंत असण्याची कुटुंबाला अजूनही आशा आहे.

दिपकच्या बाबतीत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही त्यामुळे, आम्ही अजूनही त्याच्या बाबतीत आशावादी असल्याचे त्याची बहीण श्रुतिका शेजवळ हिने सांगितले. दिपक पाठक अतिशय मनमिळावू आणि खूप समजूतदार होता. तो एअर इंडियामध्ये एका चांगल्या पदावर कार्यरत होता. मात्र असे असूनही तो लहान मोठ्यांशी आदराने आणि प्रेमाने बोलायचा. या दुर्घटनेत तो सुखरूप असावा असा विश्वास माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी व्यक्त केला.

दिपक पाठक स्वभावाने खूप प्रेमळ आणि शांत होता. कामावरुन कधीही आला तरी एक दिवस तो मित्र परिवारासाठी काढायचा. आणि त्याच्या सगळ्या कामाविषयी तो आम्हाला सांगायचा. या घटनेतून तो सुखरूप घरी येऊ दे अशी आशा त्याचा मित्र आदित्य पाटील यांनी व्यक्त केली आहे.

+