नियमांचे उल्लंघन केल्यास थेट मान्यता होणार रद्द
ठाणे : जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली आणि सहजरित्या उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हा सेतू समितीच्या बैठकीत १५२ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ना मंजुरी देण्यात आली आहे.
या सर्व अधिकृत केंद्रांची यादी ठाणे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, मंजूर ठिकाणीच केंद्र चालवणे अनिवार्य राहील. शासनाच्या नियमांचे आणि अटींचे उल्लंघन करणाऱ्या किंवा नागरिकांकडून अवाजवी शुल्क उकळणाऱ्या केंद्रांवर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट केंद्र रद्द करण्याची कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिला आहे.
१६ जुलै रोजी पार पडलेल्या सेतू समितीच्या बैठकीत या नवीन केंद्रांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. या सर्व केंद्रांना शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या सर्व सेवा नागरिकांना पुरवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
केंद्रचालकांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसारच केंद्र सुरू ठेवावे, दर्शनी भागात शासनाने निश्चित केलेले ब्रँडिंग आणि हेल्पलाईन क्रमांक लावावेत, तसेच अधिकृत दरांचा तक्ता लावणे आवश्यक आहे.
मंजूर केलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी केंद्र चालवल्याचे आढळल्यास, अथवा केंद्राबाबत कोणतीही तक्रार प्राप्त होऊन त्यात तथ्य आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता तत्काळ आणि पूर्वसूचना न देता रद्द केली जाईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेशात नमूद केले आहे.