कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाच्या भूमी अधिग्रहणासाठी १४०० कोटी

प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या कल्याण-मुरबाड प्रकल्पाच्या भूमी अधिग्रहणासाठी तब्बल १४०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच या प्रकल्पाला लवकरच गती मिळण्याचा दावा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत केला.

कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाबाबत भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवारी दिल्ली संसदीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करत या मुरबाड रेल्वे प्रकल्पाकडे केंद्र शासनाने सकारात्मकता दाखवत लवकरात लवकर प्रकल्प मार्गी लावावा व त्यासाठी संयुक्त समन्वय समिती स्थापन करावी अशी मागणी केली. खासदार म्हात्रे यांच्या विनंतीला उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकार सकारात्मक असून या प्रकल्पासाठी सुरुवातीला या प्रकल्पासाठी ८३६ कोटींचा निधी भूमी अधिग्रहणसाठी मंजूर करण्यात आला होता. मात्र या भागाचा विकास होत असल्याने आता जमीन अधिग्रहनासाठी १ हजार ४०० कोटींची खर्च येणार आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी देखील संपर्क झाला आहे. लवकरच भूमी अधिग्रहणाचा मुद्दा मार्गी लावून या कामाला गती मिळेल असे आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहात दिले.

कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी आपण सातत्याने सभागृहात आवाज उठवत आलो असून आता लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आश्वासन आपल्याला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे, अशी माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली.