रायगड मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक रिंगणात

तीन अनंत गीतेंचा समावेश

अलिबाग: रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आठ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र मागे घेतली. त्यामुळे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले आहेत. यात तीन अनंत गीते नामक उमेदवारांचा समावेश आहे.

रायगड लोकसभा मतदार संघासाठी २८ उमेदवारांची ४० नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. यापैकी छाननी दरम्यान सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे २१ उमेदवारांची २८ नामनिर्देशनपत्र शिल्लक राहीली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आठ जणांनी आपली नामनिर्देशन पत्र मागे घेतली. त्यामुळे अंतिमतः १३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहीले आहेत.

सोमवारी आस्वाद पाटील-शेकाप, सुनील तटकरी, अभिजीत कडवे, नंदकुमार रघुवीर, मिलिंद कांबळे, विजय बना, गोपाळ तंतरपाळे, अस्मिता उंदीरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे अनंत गिते (अपक्ष) अनंत गिते (अपक्ष) अनंत गिते (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), नितीन मयेकर (अपक्ष), मंगेश कोळी (अपक्ष), प्रकाश चव्हाण (भारतीय जवान किसान पार्टी) पांडूरंग चौले (अपक्ष), सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्रीनिवास मट्टरपती (अपक्ष), अजय उपाध्ये (अपक्ष), अंजली केळकर (अपक्ष), अमित कडवे(अपक्ष), कुमूदिनी चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) असे तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले आहेत. यात तीन अनंत गीते नामक उमेदवारांचा समावेश आहे. गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले असले तरी, सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका उमेदवाराने आज निवडणुकीतून माघार घेतली आहे.